ठाणे : विविध मागण्यांसाठी नाशिक येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांची मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांनी बुधवारी रात्री शहापूर येथे भेट घेतली. यानंतर दोन्ही मंत्री आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची शहापूर तहसील कार्यालयात बैठक झाली. दरम्यान, ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगत आज, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार असल्याचे मंत्री भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक अयशस्वी ठरल्यास मोर्चा विधानभवनावर धडकणारच असा इशारा माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांदा, कोथिंबीर तसेच इतर पिकांना योग्य भाव, वनजमिनीचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना यासह विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभा तसेच इतर समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले असून नाशिकहून निघालेला हा मोर्चा बुधवारी रात्री शहापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरील कळमगाव याठिकाणी पोहोचला आहे. या शेतकऱ्यांची मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांनी बुधवारी रात्री शहापूर येथे जाऊन भेट घेतली. त्यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत शहापूर तहसील कार्यालयात बैठक घेतली. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार जिवा पांडू गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांचा समावेश होता.  रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती. त्यात नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. असे असले तरी काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मंत्री भुसे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची गुरुवारी बैठक होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक अयशस्वी ठरल्यास मोर्चा विधानभवनावर धडकणारच असा इशारा माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two ministers met the farmers delegation claimed there was a positive discussion ysh