ठाणे : मुंबई महानगर पट्ट्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात नैसर्गिक धबधबे आणि झरे आहेत. पावसाळ्यात याठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी वन विभागाने धबधबे, झरे याठिकाणी प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वन विभागाने दिला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचे जंगल ठाण्याचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते.
येऊरच्या जंगलात अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे आणि झरे आहेत. पावसाळ्यात या धबधबे आणि झऱ्यांच्या ठिकाणी अनेकजण भिजण्यासाठी जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यात अधिक असते. पाण्याचा अंदाज येऊ शकत नसल्याने अनेकांचे या धबधबे, झऱ्यांजवळील छोट्या तळ्यात बुडून मृत्यू झाले आहेत. अशा दुर्घटना रोखण्यासाठी वन विभागाने यंदा धबधबे, झरे या ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय वन अधिनयम १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागाने दिला आहे.