Telangana Hit & Run Video : रस्ता ओलांडताना मोबाइलवर बोलू नका, मोबाइल वापरू नका, असे वारंवार सांगितले जाते. कारण या मोबाइलमुळेच आजवर अनेक रस्ते अपघात झालेत, ज्यात अनेकांचा नाहक जीव गेला. पण, तरीही लोक त्यातून धडा घेण्याचे नाव घेत नाहीत. अशाचप्रकारे मोबाइलवर बोलता बोलता रस्ता ओलांडणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रविवारी एका महामार्गावर भरधाव कारनं एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने व्यक्ती बाचकली, तिला काय करावे पटकन सुचले नाही, इतक्यात कारने त्याला जबरदस्त धडक दिली, कारचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती काही अंतर हवेत उडाली आणि जोरात जाऊन जमिनीवर कोसळली. या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बोड्डू गिरी बाबू असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अन्नोजीगुडा भागातील आरजीके कॉलनी येथील रहिवासी होता. ही व्यक्ती हैदराबादमधील एनटीपीसी एक्स रोडजवळ मोबाइलवर बोलत रस्ता ओलांडत होती, त्यावेळी ही घटना घडली. ही हृदयद्रावक घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोबाइलवर बोलत ओलांडत होता हायवे इतक्यात…

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बोड्डू गिरी बाबू हायवेवरील रस्ता ओलांडत असताना मोबाइल फोनवर बोलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेवढ्यात एक भरधाव कार येऊन त्याला धडकली, त्यामुळे तो हवेत कित्येक फूट उंच उडाला आणि थेट रस्त्यावर जोरात पडला. यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

More Stories On Viral Video : “अशी गुंडगिरी करत फिरू नका!” धार्मिक स्थळावर हिरोपंती करणाऱ्या तरुणांना पोलिसांना खडसावले; video व्हायरल

निष्काळजीपणा अन् तरुणाचा बळी

हैदराबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हैदराबादमध्ये दोन दिवसांतील हा दुसरा मोठा रस्ता अपघात आहे. यापूर्वी १३ जुलै रोजी गचीबोवली येथे २६ वर्षीय फूड डिलिव्हरी एजंटची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली, परिणामी त्याचा मृत्यू झाला.

या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ता ओलांडताना मोबाइलवर बोलू नका असे आवाहन अनेकदा केल जाते. पण याकडे पादचारी नेहमी दुर्लक्ष करतात आणि अशा अपघातांचे बळी ठरतात. याशिवाय वाहनचालकांनाही अतिवेगाने वाहन न चालवण्याच्या आणि रस्ते नियम पाळण्याच्या सूचना दिल्या जातात. पण, तरीही चालक त्याकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवतात; तसेच लोकही अतिशय चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडतात, ज्यामुळे अपघाताच्या अशा घटना घडतात.