वसई : वसई विरार महापालिकेचे वादग्रस्त तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात वसई विरार महापालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला होता. सक्तवसुली संचलनालयाने भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छाप्यात रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी ८ कोटी २३ लाखांची रोकड आणि २३.२५ कोटींची दागिने असे ३१ कोटींचे घबाड सापडले होते. या प्रकरणी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रींग कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला होता. रेड्डी यांनी गैरमार्गाने ही अपसंपदा गोळा केली असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या तक्रारी वरून आचोळे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १३(१) ब सह १३ (२) प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू आहे. यात त्यांच्या संबंधित असलेल्या सर्वच विभागातून माहिती गोळा केली जात असून त्यांचे सर्व धागे दोरे पडताळून घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी ईडीने ही रेड्डी यांना अटक केली आहे.
रेड्डी यांच्या विभागातील प्रमुखांची चौकशी होणार
नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते, वास्तूविशारद, सीए आणि याप्रकरणातील काही दलाल यांच्या संगनमताने असे घोटाळे करण्यात येत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले होते. याशिवाय रेड्डी यांचा १० रुपयांचा प्रतिचौरस फूट लाचेचा दर ही समोर आला होता. त्यामुळे आता या विभागातील प्रमुखांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.