भाईंदर : भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चौहान (५५) आणि मखनलाल यादव (२६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘श्री नाथ ज्योती’ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चौहान यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे काम सुरु असताना किचन मधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगार्‍याखाली कंत्राटदार हरिराम चौहान आणि कामगार मखनलाल यादव व आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगार्‍यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरीनाम चौहान आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर आकाश यादव हा यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल

संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश.

भाईंदर मधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही पाच मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मिराभाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले आहेत.