भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील स्टीलने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे साहित्य चोरीला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून महापालिकेचेही लाखोंचे नुकसान झाले आहे.

मिरा भाईंदर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागांत आधुनिक व टिकाऊ अशा स्टील बस थांब्याची उभारणी केली आहे. शहरात सध्या पंधराहून अधिक बस थांबे आहेत. या थांब्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून, ही टिकावीत अशी अपेक्षा होती. मात्र सध्या या थांब्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास येत आहे.

याआधी शहरातील नाल्यांवरील लोखंडी झाकणे व पदपथांवरील जाळ्या चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आता बस स्थानकांचे साहित्यही चोरीला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तथापि, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरीही लवकरच शहरातील सर्व बस स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

हटवलेले बस थांबे कुठे गेले?

मिरा भाईंदर शहरात सिमेंट रस्त्यांच्या उभारणीसाठी काही बस थांबे तात्पुरते हटवून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले होते. मात्र रस्त्यांचे काम पूर्ण होऊनही हे बस थांबे मूळ जागी पुन्हा बसवण्यात आलेले नाहीत.विशेष म्हणजे, यापूर्वी कडेला ठेवलेले काही बस थांबेदेखील आता गायब झाले आहेत. त्यामुळे हे थांबे नक्की कुठे गेले असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.