आजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही कमी होत आहे. अशा स्थितीत प्रामाणिक माणसांचे मौन घातक आहे. आपण गप्प बसल्यानेच ही वेळ आली आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्व सज्जनांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केले.
येथील स्टेडियम मैदानावर महासत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रविशंकर म्हणाले की, समाजात चांगली माणसे राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे गुन्हेगारांनी राजकारणाचा ताबा घेतला आहे. गुन्हेगार संसदेत जाऊन बसले आहेत. बहुतेक राजकारण्यांनी भ्रष्ट मार्गाने पैसा कमविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आता बदलण्याची वेळ आली आहे. भ्रष्ट मार्गाने कोटय़वधी रुपये कमावून पुन्हा तुरुंगात जाणारे राजकारणी आपल्या या मालमत्तेचे करतात तरी काय? कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही, तोवर देश सुधारणार नाही.
समाजात स्त्रियांनी संघटित होऊन पुढे आले पाहिजे. महाराष्ट्रात संतांनी घडवले तेच परिवर्तन पुन्हा घडविण्याची वेळ आली आहे. स्त्री भ्रूणहत्या होता कामा नयेत. हा एक प्रकारचा कलंक असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार शेषराव देशमुख, सुरेश वरपुडकर, महापौर प्रताप देशमुख, सुरेश देशमुख, डॉ. विवेक नावंदर आदींनी त्यांचे स्वागत केले. महापौर देशमुख यांनी रविशंकर यांना मानपत्र अर्पण करून सत्कार केला. स्थानिक संयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good person should take a lead to change the currupt politics