कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे लाभ प्रत्यक्षात मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो, असे विदारक चित्र आहे. यासंदर्भात शरद इंगळे, गुरुदास बावणे, मनोज रागीट, सुधीर बोरकर, संतोष ठाकरे आणि वसिम खान यांनी आपबिती कथन केली. एमआयडीसीमध्ये काम करणारे हे कर्मचारी असून एमआयडीसीवरून सोमवारी क्वार्टरमधील दवाखान्यातून त्यांना विम्याचे लाभ मिळाले नाहीत.
सुधीर बोरकर व शरद इंगळे यांनाही याचा फटका बसला आहे. लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी सांगितले, आम्ही एमआयडीसीमध्ये काम करतो. आमच्या पगारातून विम्याचे पैसे दर महिन्याला कापले जातात. मात्र, जेव्हा कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) दवाखान्यात गेल्यावर त्याठिकाणी आम्हाला उपचार घेता येत नाहीत. मेडिकलमध्ये किंवा इतर दवाखान्यात आम्हाला पाठवले जाते. मेडिकलमध्ये तीन तास थांबूनही डॉक्टर पेशंटला तपासत नाही. गरोदर बायकोला प्रथम ईएसआयसीमध्ये घेऊन गेलो होतो. पण, त्यांनी मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मात्र, दुपारी ४.३० पर्यंत डॉक्टरांनी बायकोला न तपासल्याने खाजगी दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी चार हजार रुपयांचे बिल आले. दर महिन्याला ईएसआयसीसाठी पगारातून नियमित कपात होते.त्याचे लाभच आम्हाला मिळत नसतील तर विम्याच्या दवाखान्याचा उपयोग काय, असा प्रश्न इंगळे यांनी उपस्थित केला.
विम्याच्या दवाखान्यातील डॉक्टर लवकर येत नाहीत. केव्हाही सुट्टीवर असतात. सकाळी ११ चे दुपारी १२ या दरम्यानच ते उपलब्ध होतात. रुग्णांना मात्र, ९.३० वाजता यायला सांगतात. त्या ठिकाणी गेल्यावर रुग्णांच्या लांबच लांब रांगा तेवढय़ा दिसतात. मनोज रागीट म्हणाले, एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार फार नसतात. त्यांना खाजगी दवाखाना परवडत नाही. मात्र, ईएसआयसीमध्ये केवळ २५ टक्के रुग्ण उपचार घेतात. त्यातही उपचार मिळत नाहीत. चार वर्षांआधी सरकारी ओळखपत्र बनवले. देशभरात कोणत्याही ठिकाणी या ओळखपत्राचा लाभ होईल, असे त्यावेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात एमआयडीसीतून सोमवारी क्वार्टरला यावे लागते, अशी स्थिती आहे.