छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी १९ मे रोजी पार पडली. वाल्मीक कराडच्या निर्दोष सोडण्याच्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली नसून, ती ३ जून रोजी अपेक्षित आहे. दरम्यान, विष्णू चाटेकडूनही निर्दोषत्वाशी संबंधित अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, तो अर्ज मागे घेण्यात आला.

सरकारी अभियोक्ता बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले, की सोमवारच्या सुनावणीवेळी तीन गुन्ह्यांतील मूळ फिर्यादी शिवराज देशमुख, थोपटे व शिंदे यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. मागील सुनावणीवेळी त्यांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश होते. तर आरोपींच्या वकिलांनी सांगितले, की यापूर्वीच्या सुनावणीवेळी दोषारोपपत्रात जोडलेली काही तंत्रज्ञानाआधारित पुरावे देण्याची मागणी केलेली होती. त्यातील काही पुरावे सोमवारच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला देण्यात आले आहेत. तर, काही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत असल्याचे सांगण्यात आले. विष्णू चाटेचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते.