छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील ४५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधील एकही काम गेल्या नऊ महिन्यांपासून पुढे सरकले नाही, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. आम्ही वॉटर ग्रीडसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, वर्ल्ड बँकेकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी उत्तर दिले. पण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीबाबत वारंवार प्रश्न विचारूनही त्यांनी उत्तरांची सारवासारव केली.

या बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. मराठवाड्यातील अन्य पालकमंत्री बैठकीस गैरहजर होते. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे विशेष परवानगी मागितली असून, त्यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी मिळावा, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले जात नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

हेही वाचा >>>राज्यात भूजल वापर, नियंत्रणात बजबजपुरी

चाराटंचाई व पाणीटंचाई यावर माहिती दिल्यानंतर तीन दिवसांत गावाची तक्रार सोडवली जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाड्याच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाची नऊ महिन्यांपासून अंमलबजावणीच झाली नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. आमचे मराठवाड्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, एवढेच ते म्हणाले. खरीप हंगामातील नुकसानभरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. ती रक्कम तसेच अतिवृष्टीचीही रक्कम मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यात चारा छावणी उघडण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत अधिकाऱ्यांनी १६८ दिवस चारा पुरेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा होत नाही, त्यांनी ठरवून दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क केला तर तीन दिवसांत पाणी व चारा या समस्या दूर केल्या जातील, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंना टोला

मी शेतकऱ्यांबरोबर राहणारा आहे. त्यामुळे मी निवडणुकीनंतर इंग्लंड येथे जात नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मराठवाड्यात ‘गेल इंडिया’ च्या वतीने येणारा प्रकल्प मध्य प्रदेशात जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आम्ही सहा लाख कोटी रुपयांचे उद्याोग आणले आहेत. गेल इंडिया प्रकल्पाबाबतची माहिती घेऊ, असेही ते म्हणाले. ही बैठक म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बैठकीनंतर केला.