– प्रवीर सिन्हा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका द्विपक्षीय भागीदारीला निश्चितच बळकटी मिळाली आहे. पंतप्रधानांनी यापूर्वी अनेक वेळा अमेरिकेला भेट दिली आहे, तथापि, या भेटीकडे जगाचे विशेष लक्ष वेधले गेले. कारण यावेळच्या त्यांच्या या भेटीत उभय देशांतील सामायिक मूल्ये, सांस्कृतिक संबंध आणि लोकांतील परस्पर संबंध अशा सर्वांगाने दोन राष्ट्रांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीवर विशेष भर दिला गेला. दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे अनेक ठिकाणी झालेले उदंड स्वागत या दोन लोकशाही राष्ट्रांमधील आपुलकी, विश्वास आणि परस्पर सामंजस्य यांनाच अधोरेखित करणारे होते. राजकीय, आर्थिक, संरक्षण, राजनैतिक आणि जन-सामाजिक संबंध केंद्रस्थानी ठेवून, भारत-अमेरिका यांच्यातील संबंधाची पावले आता नव्या चौकटीत धोरण आणि व्यूह आखणीच्या दिशेने अग्रेसर झाली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अमेरिकेच्या वाणिज्य जगतातील नेत्यांसह पंतप्रधान मोदी यांच्या चर्चा आणि भेटीगाठींमुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण आणि प्रतिभा विकास यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तेथील खासगी क्षेत्रातून सहकार्य वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे. दोन देशांतील मजबूत आर्थिक भागीदारी भारतीय उद्योगविश्वाला चालना देणारी ठरेल. स्वातंत्र्याचा शतकमहोत्सवी क्षण जवळ येत असताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत पायाभरणीचे काम यातून केले जाईल. केवळ इतकेच नाही, तर ही दोन राष्ट्रे एकमेकांची सर्वात जवळची भागीदार आहेत हा दृष्टिकोन आणि त्याला आधार देताना उभयतांमधील विविध आघाड्यांवरील भागीदाऱ्या या संपूर्ण जगाच्या भल्यासाठीही उपयोगी ठरतील. या दिशेने दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांचा भर हा समृद्ध भविष्यासाठी मजबूत आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांचा मार्ग मोकळा करण्यावर आहे. विशेषत: हवामान बदलाच्या परिणामांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘आयपीसीसी’ अहवालातील, सरासरी जागतिक तापमानात दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याच्या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, दोन राष्ट्रांतील सुदृढ संबंध हे अधिक चांगल्या आणि शाश्वत वसुंधरेसाठी कार्यप्रवण दोन सक्षम नेत्यांचा पुढाकार यादृष्टीनेही खूप आश्वासक संकेत देणारे आहेत.

हेही वाचा – अदाणींचे शेअर्स रॉकेटच्या वेगानं वाढले; ५० हजार कोटी कमावले

सशक्त आणि समृद्ध भारतीय अर्थव्यवस्थेची घडणी करावयाची झाल्यास, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी अर्थात राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व ओळखून, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, संयुक्तपणे नवकल्पनांना साकारणे आणि सह-उत्पादनावर अधिक भर देऊन संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी या दौऱ्यादरम्यान केले गेलेले विविध करार-मदार खूपच उत्साहवर्धक आहेत. यामुळे देशात संरक्षण क्षेत्रात मजबूत आणि प्रगत पायाभूत सुविधा निर्माण होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. अवकाश विज्ञान, सेमीकंडक्टर, औषधी व जैव तंत्रज्ञान, परिमाण तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञान वगैरेंचा प्रगत तंत्रज्ञानात्मक सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्र म्हणून समावेश केला गेला आहे. यातून भारतीय उद्योग क्षेत्राला अत्यंत आवश्यक तंत्रज्ञानात्मक प्रगती आणि त्या परिणामी स्पर्धात्मक फायदा मिळू शकेल.

पंतप्रधान मोदी यांच्या या महत्त्वाच्या भेटीमुळे आणि तिच्या नजीकच्या परिणामांमुळे भारताच्या स्थापित यशोगाथेला नजीकच्या काळात इष्टतम रूप धारण करण्यास नक्कीच नवचैतन्य प्रदान केले गेले आहे. हे ज्या वेळी घडून आले ती घडीही विशेष महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर कंपन्यांकडून पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उच्च वाढीच्या क्षमता असलेल्या पर्यायी बाजारपेठेचा त्या शोध घेत आहेत. दोन देशांमध्ये व्हिसाविषयक नियमांमध्ये अधिक सुलभता आणि अधिक वाणिज्य दूतावास उघडण्याची योजना म्हणजे मानवी भांडवलाच्या संबंधाने उभयतांमधील उत्कट स्वारस्य आणि मान्यतेला दर्शवणारे आहे.

हेही वाचा – टाटा मोटर्सची मोठी घोषणा, कंपनी DVR शेअर्सचे सामान्य शेअर्समध्ये रूपांतर करणार, तुम्हाला काय फायदा?

या दौऱ्याच्या वरील सर्व आणि इतर प्रमुख परिणामांमुळे भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनांना आणखी बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे. व्यापार, गुंतवणूक आणि नवोपक्रमांना यातून प्रोत्साहन मिळेल. कारण दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक भागीदारी निर्माण करण्याचा दृढ संकल्प दाखवला आहे, जो खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूंनी सारखाच स्वारस्यपूर्णही आहे आणि हेच या मजबूत आणि चिरस्थायी द्विपक्षीय संबंधांचे खास वैशिष्ट्यही आहे. व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि त्यायोगे आंतरराष्ट्रीय संबंधांतील कटिबद्धता मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयकडून तिच्या सदस्यांना राज्य, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यालयांद्वारे समर्थन आणि सेवा प्रदान केली जाते. सीआयआयचा पश्चिम विभाग व्यवसाय सहयोग, विविधता, समावेशकता, नवोद्यमी उपक्रमांना पाठबळ व मार्गदर्शन यासारख्या क्षेत्रांमध्ये मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासह एकत्रितपणे काम करत आहे. या सहकार्याद्वारे, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींसाठी दोन्ही देशांतील वाणिज्य शिष्टमंडळांच्या भेटीगाठींची आखणी व नियोजनही केले जात असते.

(लेखक सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि टाटा पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indo us strong friendship beneficial in the eyes of the world as well print eco news ssb