दुलारी देशपांडे
मराठी कुटुंबात जन्माला आल्यामुळे आपल्याला असणारं मराठीप्रेम स्वाभाविक आहे. मात्र परदेशांत जन्माला येऊन मराठी भाषा आत्मसात करणं, तिला संशोधनाचा भाग बनवणं, ती परदेशांत शिकवणं, त्यात लेखन करणं यासाठी तपश्चर्या लागते. अशाच या चार जणी. भारतीय इतिहासाचा अभ्यास करता करता त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा परिचय झाला. संस्कृती, इतिहास नीट समजून घ्यायचा असेल तर मराठी भाषा यायलाच हवी, हे लक्षात घेऊन अडेलं हेनिश टेंबं, रोझालिंड ओ’ हॅनलॉन आणि रिचेल स्टोरमन यांनी मराठीचा जाणीवपूर्वक आणि कसून अभ्यास केला. तर पॉला माक्ग्लिन यांना भुरळ घातली मराठी चित्रपटसृष्टीनं. त्याचा अभ्यास करता करता त्यांनी त्याचं व्यावसायात रूपांतर केलं. या मराठीप्रेमींची ओळख मराठी राजभाषा दिवसाच्या (२७ फेब्रुवारी) निमित्तानं.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून भारतीय इतिहासाच्या प्राध्यापकपदावरून सेवानिवृत्त झालेल्या रोझालिंड (पॉली) ओ’ हॅनलॉन या भारताच्या वसाहतीविषयक इतिहासाच्या तज्ज्ञ. त्यांचा महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी अतिशय जिव्हाळयाचा संबंध आहे. त्याच जिव्हाळय़ातून त्यांनी पाश्चात्त्य जगाला आपल्या महान इतिहासाची ओळख करून दिली आहे.क्लेअर कॉलेजच्या सेवानिवृत्त फेलो असणाऱ्या रोझालिंड ‘ब्रिटिश अकॅडमी’च्याही फेलो आहेत. भारतीय वसाहतवादाच्या काळावरची त्यांची अनेक इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. रोझालिंड यांचे पूर्वज साधारण शंभर वर्षांपूर्वी आर्यलडमधून युनायटेड किंग्डममध्ये राहायला आले. रोझालिंड यांचा जन्म
१९५३ चा. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंबीय केनियाला (आफ्रिका) स्थलांतरित झाले. केनियाच्या वायव्येला असणाऱ्या किटेल शहराजवळ त्यांचं शेत होतं. केनिया ही त्या वेळी ब्रिटिशांची वसाहत होती. रोझालिंड तिथेच लहानाच्या मोठय़ा झाल्या. लहान वयापासूनच अशा तऱ्हेनं त्यांचा संबंध ब्रिटिश साम्राज्याच्या उत्तरार्धातल्या इतिहासाशी जोडला गेला. रोझालिंड यांचे वडील भाषाशास्त्रज्ञ. त्यामुळे त्यांनी मुलांना स्थानिक स्वाहिली भाषा बोलायला शिकवली. रोझालिंडना अगदी त्या लहान वयातदेखील आपल्या कुटुंबीयांचं जीवन आजूबाजूच्या असंख्य आफ्रिकी लोकांच्या, शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या जीवनापेक्षा संपूर्णपणे वेगळं असल्याचं जाणवत असे. १९६३ मध्ये केनिया स्वतंत्र झाला. रोझालिंडच्या कुटुंबातही त्यावेळच्या बदलत्या परिस्थितीची चर्चा होत असे. या सगळय़ाचा परिणाम म्हणून १९६५ मध्ये रोझालिंड यांच्या आईवडिलांनी युनायटेड किंग्डमला कायमचं परतण्याचं ठरवलं. रोझालिंड त्या वेळी बारा वर्षांच्या होत्या. रोझालिंडच्या बालमनावर केनियातल्या त्या काळाचा, त्या वेळच्या विचित्र परिस्थितीचा सखोल ठसा उमटला. थोडं मोठं झाल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या केनियातल्या भूमिकेविषयी, आईवडिलांच्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांमध्ये आढळणाऱ्या वसाहतवादी कल्पनांविषयी मोठय़ा प्रमाणावर प्रश्न पडू लागले. पुढे पुढे तर त्यांच्या घरात या विषयावरून वादावादी, भांडणंही व्हायला लागली. हे होता होता १९६० वर्ष उजाडलं. ‘यू.के.’मध्ये आता साम्राज्यशाहीविरोधातल्या मतप्रवाहाचे जोरदार वारे वाहायला लागले. साम्राज्यशाहीच्या बाजूनं बोलणारी रोझालिंडच्या आईवडिलांच्या पिढीतली माणसं हळूहळू संख्येनं कमी होत गेली. असं जरी असलं, तरी ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास ब्रिटिश समाजसंस्कृतीचा मुख्य गाभा बनून राहिला होता, ही गोष्टसुद्धा तितकीच खरी होती. या सगळय़ा गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पुढे इतिहासकार व्हायचं आहे हे रोझालिंड यांनी आधीच ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी १९७२ मध्ये इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. ब्रिटिश साम्राज्याची वसाहत असलेल्या एखाद्या महत्त्वाच्या भूभागावर त्यांना संशोधन करायचं होतं. आफ्रिका एका अर्थानं त्यांचं घरच होतं. त्यामुळे आफ्रिकेवर संशोधन करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. केंब्रिजमध्ये ‘महाराष्ट्राचा इतिहास’ या विषयाचे तज्ज्ञ प्रो. जॉर्डन जॉन्सन त्यांना शिकवायला होते. प्रो. जॉर्डन लोकमान्य टिळकांवरच्या त्यांच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होते. जुन्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार कसा झाला, याविषयी आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा साम्राज्याबरोबर दीर्घकाळ चाललेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वंद्वयुद्धावर त्यांनी एक वर्ग घेतला होता. रोझालिंड त्या वर्गाला उपस्थित होत्या. रोझालिंडनी मराठा सरदारांनी उत्तर आणि मध्य भारतातल्या युद्धांमध्ये गाजवलेल्या पराक्रमाविषयी वाचलं होतंच. त्याच वेळी मराठी लोकांच्या कीर्तन-पोवाडय़ांसारख्या मौखिक परंपरेतल्या कलाप्रकारांचीही रोझालिंड यांच्या मनाला भुरळ पडली. महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या वारकऱ्यांच्या समतावादी भक्ती चळवळीविषयी रोझालिंडना ठाऊक होतं. मराठय़ांच्या सत्ता आणि संस्कृतीचा विस्तार करण्याच्या कामी मराठी स्त्रियांनी दाखवलेली कार्यतत्परता त्यांना खूपच भावली होती. पेशव्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांनी दाखवलेलं मुत्सद्देगिरीतलं कौशल्य, ताराबाई भोसले यांचं लष्करी नेतृत्व, अहिल्याबाई होळकरांचं सांस्कृतिक आणि प्रशासकीय यश, मराठा सरदारांच्या लष्करी छावण्यांमध्ये नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून युद्धभूमीवर जाणाऱ्या कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया, या सर्व गोष्टी त्यांना खूप आवडल्या होत्या. खरं सांगायचं, तर या सगळय़ा गोष्टींमुळे रोझालिंड महाराष्ट्राच्या अगदी प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे केंब्रिजमधून पदवीधर झाल्यावर त्यांनी ‘पीएच.डी.’साठी महाराष्ट्राच्या इतिहासातल्या काही पैलूंवर संशोधन करायचं ठरवलं. साहजिकच त्यासाठी मराठी भाषा येणं अगदी गरजेचं होऊन बसलं. मग लंडनच्या ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज’मध्ये त्या दोन वर्ष मराठी शिकल्या. तिथे त्यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात १९५० च्या दशकात मराठीचे धडे गिरवलेल्या डॉ. इयान यांचं मार्गदर्शन लाभलं.
डॉ. इयान यांनी मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या महानुभाव चळवळीवर मूलभूत संशोधन केलं आहे. रोझालिंडना केनियात असताना स्वाहिली भाषा शिकण्याच्या त्यांच्या अनुभवाचा मराठी भाषा शिकत असताना खूपच फायदा झाला. स्वाहिली भाषेत खूप अरबी आणि फारसी शब्द आहेत. संशोधनाकरिता जुनी मराठी पुस्तकं वाचत असताना त्यांना त्यात बरेच अरबी आणि फारसी शब्द आढळले. सुरुवातीपासूनच त्यामुळे त्यांना मराठी भाषेविषयी एक प्रकारचा आपलेपणा वाटत गेला.
मराठी भाषेची लिपी गिरवताना तर रोझालिंड यांना खूपच आनंद झाला. लघुलेखनासाठी करण्यात आलेला मोडी लिपीचा वापर फार आकर्षक वाटला. आज रोझालिंडना मराठी छान वाचता येतं, लिहिता येतं. मात्र बोलण्याचा फारसा सराव नसल्यामुळे ती बोलणं त्यांना थोडं जड जातं. इतिहासाइतकाच त्यांच्या संशोधनातला भाषेचा भाग त्यांना अगदी मनापासून आवडतो, असं त्या सांगतात. संशोधनानिमित्तानं रोझालिंड महाराष्ट्रात ३५ पेक्षाही जास्त वेळा येऊन गेल्या आहेत. इथे आल्यावर मराठी लोकांना अनपेक्षितपणे मराठीत उत्तरं देऊन आश्चर्यचकित करायला रोझालिंडना फार आवडतं! महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत विचार करताना, मराठी लोकांचं मैत्रीपूर्ण वागणं आणि मराठी लोकांचा पाहुणचार त्यांना सर्वात प्रथम आठवतो. मराठमोळय़ा पिठलं-भाकरीची चव आजही त्यांच्या जिभेवर रेंगाळते.
एक अतिशय प्रभावी नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा महान, द्रष्टा नेता म्हणून रोझालिंड आदरानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतात. १८८२- म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या हक्कांविषयी जागृत होऊन लेखन करणाऱ्या ताराबाई शिंदे त्या काळातल्या पहिल्या स्त्री होत्या. ज्या पाश्चात्त्य विद्वानांना मराठी वाचता येत नाही, मात्र ज्यांना वसाहतवादाच्या काळातल्या भारतीय स्त्रियांच्या चळवळींवरून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, अशांसाठी रोझालिंड यांनी ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाचा ‘अ कम्पॅरिझन बिटवीन विमेन अॅण्ड मेन’ हा इंग्रजीत अनुवाद केला आहे. पश्चिम भारतातल्या जातीव्यवस्थेवरचं ‘कास्ट, कॉन्फ्लिक्ट अॅण्ड आयडॉलॉजी’ हे पुस्तक लिहिताना त्यांनी संदर्भासाठी इंग्रजी पुस्तकांच्या जोडीला जोतिबा फुले- बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या विषयावरची मूळ मराठी पुस्तकंसुद्धा वाचली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि पाश्चात्त्य जगाला इथल्या महान इतिहासाची ओळख करून देणाऱ्या डॉ. रोझालिंड ओ’ हॅनलॉन या जगप्रसिद्ध इतिहासकाराच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र कायमचा ऋणी राहील.
सांस्कृतिक महाराष्ट्राची भुरळ
दुलारी देशपांडे
मुंबईत दादर इथे असलेल्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’तल्या संदर्भ विभागातला इतर दिवसांसारखाच एक दिवस. संदर्भाचा ‘पीएच.डी.’ विभाग. अंगानं किडकिडीत म्हणावी इतकी बारीक, मानेपर्यंत कापलेल्या आखूड केसांची, चेहऱ्यावर उठून दिसणाऱ्या लांबुडक्या नाकाची, जेमतेम पाच-चार उंचीची, फिकट रंगाचा चुडीदार घातलेली एक स्त्री समोरच्या मासिकांच्या ढिगात डोकं खूपसून बसली होती.
तिच्या लालसर गोऱ्या रंगाकडे लक्ष गेलं आणि तिचं युरोपियन वेगळेपण डोळय़ांत ठसलं. ‘एंट्री बुका’त डोकावल्यावर तिथं चक्क मराठीत ‘रिचेल स्टोरमन’ असं नाव दिसलं. अस्सल मराठमोळय़ा ग्रंथसंग्रहालयात या मडमेचं काय काम? माझ्या मनात ‘मराठी’ कुतूहल जागं झाल्यामुळे मी या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं. रिचेल पीएच.डी. विभागात बसून त्यांच्या कामात पूर्ण तल्लीन झाल्या होत्या. मी वाचकांच्या विभागातून बघत होते. वाचता-वाचता रिचेल मधून मधून उठून उभं राहात हातातल्या मोबाइल कॅमेऱ्यानं टेबलावर ठेवलेल्या मासिकातल्या पानांचे फोटो काढत होत्या. कशाचे असावेत बरं? माझं कुतूहल शमवायला मी अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्यासमोर जुन्या, पिवळय़ा पडलेल्या शतकभरापूर्वीच्या मासिकांचा ढीग होता. एका मासिकाचं नाव होतं, ‘मनोरंजन’!
जन्मानं, धर्मानं, कर्मानं.. आणखी कशाकशानं मी ‘मराठी’ असूनही ‘मनोरंजन’ मासिकाचे सर्व अंक कधीही चाळले नव्हते. मी त्यांना थेट मराठीत विचारलं, ‘‘तुम्ही हे काय करताय?’’ माझ्या या अचानक मराठी हल्ल्यानं त्या बावरल्या. त्या प्रश्नाला मराठीतून उत्तर देण्यासाठी शब्द शोधायला लागल्या. तसं मन आपुलकीनं भरून गेलं. ‘‘घाबरू नका. माझं इंग्रजी अगदी तुमच्या मराठीइतकंच ‘चांगलं’ आहे!’’ असं म्हणत धीर दिला. त्या अगदी मनापासून हसल्या. आमच्यातली भाषेची, औपचारिकपणाची बंधनं गळून पडली आणि मनमोकळय़ा गप्पांना सुरुवात झाली.
रिचेल अमेरिकेत इतिहासाच्या प्रोफेसर असल्याचं समजलं. बोस्टनजवळच्या बाडेन् कॉलेजात त्या अठराव्या शतकातला आधुनिक भारताचा इतिहास शिकवतात. रिचेल यांचे पूर्वज मूळचे पूर्व युरोपातले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ते पूर्व युरोपातून अमेरिकेत स्थायिक झाले. त्याला शे-सव्वाशे वर्ष झाली.
रिचेल यांच्या दिसण्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज लागत नव्हता. मनमोकळेपणा आल्याचं पाहून हळूच मी त्यांना वय विचारलं, चौसष्ट! आणि अजूनही त्या कॉलेजात भारताचा इतिहास शिकवत होत्या. भारतातला ब्रिटिश साम्राज्याचा सुरुवातीचा काळ (१८५८), प्रत्यक्ष ब्रिटिश राजवटीचा काळ (१८५८ ते १९४७) आणि ब्रिटिश राजसत्तेनंतर भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतचा काळ (१९४७ ते २०२३). इतिहासाचा एवढा मोठा पल्ला रिचेल यांच्या अभ्यासाचा विषय. जन्मानं युरोपीय आणि कर्मानं अमेरिकी असललेल्या रिचेल भारताच्या इतिहासाकडे वळण्याचं सारं श्रेय त्या त्यांच्या अमेरिकेतल्या भारतीय मित्रमैत्रिणींना देतात.
‘‘भारतीय माणसं मला खूप आवडतात. प्रत्येक गोष्टीतल्या इथल्या वेगळेपणाचं, इथल्या वेगवेगळय़ा संस्कृतींचं फार अप्रूप वाटतं,’’ रिचेल मनापासून सांगत होत्या. ‘‘भारतापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही तर मराठी वाचताय, ते कसं काय?’’ या माझ्या प्रश्नावर त्यांनी जे सांगितलं तेही रंजक आहे. अमेरिकेतल्या भारतीय मित्रमैत्रिणींमुळे निर्माण झालेल्या भारताविषयीच्या आवडीतून रिचेल पदवीधर झाल्या झाल्याच भारतात आल्या. उत्तर भारतात राहून त्यांनी काही काळ हिंदीचा अभ्यास केला. नंतर त्या भारतभर फिरल्या. ‘‘मी जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा मला इथली माणसं, इतकंच काय, इथली नऊवारी साडीही खूप आवडली! (हे अगदी स्त्रीसुलभ होतं!) ‘फुले-आंबेडकरी चळवळीं’ची, एकूणच बहुजनांच्या चळवळींच्या इतिहासाची मनाला भुरळ पडली. मग सुरुवातीला मी इंग्रजीत लिहिलेली महाराष्ट्राच्या इतिहासावरची पुस्तकं, साहित्य मिळेल तसं वाचून काढलं.
महाराष्ट्रानं भारताला अनेक द्रष्टे सुधारक दिलेत. मला मग या संपूर्ण प्रदेशाचा अभ्यास करावासा वाटला. हा प्रदेश समजून घेण्यासाठी, इथल्या सर्वसामान्य माणसांशी बोलण्यासाठी इथली प्रादेशिक भाषा येणं गरजेचं वाटलं. मग मी पुण्याला जाऊन ‘अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन स्टडीज’मध्ये जवळपास दीड वर्ष मराठीचे धडे घेतले. अजूनही माझं मराठीचे धडे गिरवणं सुरूच आहे. आज मी मराठी लिहू शकते, हळूहळू का होईना, वाचू शकते. ‘लोकसत्ता’सारखी वर्तमानपत्रंही वाचत असल्याचं तिनं आवर्जून सांगितलं. पण बोलायला पुरेशी संधी मिळत नसल्यानं मराठी बोलताना थोडं अडखळल्यासारखं होतं. मराठीची शब्दसंपत्ती अमाप आहे. एकाच गोष्टीसाठी मराठीत वेगवेगळे बरेच शब्द आहेत. त्यामुळे एकच गोष्ट मराठीत वेगवेगळय़ा प्रकारे बोलता येते,’’ रिचेल मराठीविषयी भरभरून बोलत होत्या. त्यातून त्यांचं मराठीप्रेम व्यक्त होत होतं.
मराठीत इंग्रजीपेक्षा जवळपास दुपटीनं मुळाक्षरं आहेत. याचा उघड अर्थ मराठी भाषा बोलताना इंग्रजी भाषेपेक्षा जास्त ध्वनी काढता येतात. मराठी भाषा शिकणं परकीयांना त्यामुळे कदाचित अवघड जाऊ शकतं. याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मराठीत शब्दाचं लिंग ठरवताना, उदा. झाड म्हणताना ते, तो की ती? हे सांगताना नेहमी माझी गडबड उडते. पण तरी मी प्रयत्न करायचं सोडत नाही. मराठी माणसं उदार, दयाळू आणि सहनशील असल्यामुळे माझं निभावतं!’’ ‘‘मिळणारी प्रत्येक संधी स्वीकारून मराठी मी सतत सुधारत राहीन!’’ असं सांगणाऱ्या रिचेल यांच्या चेहऱ्यावर विद्यार्थी म्हणून असलेला खरेपणा दिसतो. आणि त्यांना हवा तो सराव करता यावा यासाठी त्यांच्याशी आवर्जून मराठीमध्येच बोलणारे लोक त्यांना अधिकाधिक भेटावेत असं मनोमन वाटत राहतं.
मराठी भाषेचं ऋण
जयश्री हरी जोशी
अडेलं हेनिश टेंबं ही माझी जर्मन सखी. ती लाईप्तिस्ग विद्यापीठात गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी भाषेचं अध्यापन करते आहे. या दोन्ही भाषांवर तिचं प्रभुत्व आहे, पण मराठी भाषेशी तिचं एक खास ठेवणीतलं, मखमलीचं नातं आहे आणि ते ती जिवापाड जपते..
या जर्मन स्त्रीची नाळ मराठी भाषेशी भावार्थानं जुळलेली आहे. ही मूलत: इंडॉलॉजीची अभ्यासक. मानववंशशास्त्र, भारतीय विद्या, हिंदू जीवनदृष्टी हे तिचे प्रारंभिक अभ्यासाचे विषय. त्याचबरोबर तिनं हिंदी आणि मराठी शिकायला सुरुवात केली. १९९९ मध्ये अडेलं पहिल्यांदा भारतात आली. सहा महिने पुण्यातल्या मराठी कुटुंबात राहिल्यानं तिला मराठी- संस्कृतीचा चांगलाच परिचय झाला. शिल्पा सुमंत यांच्याकडे तिनं प्रगत मराठीचे प्रत्यक्ष धडे घेतले आणि काही दिवसांतच ती सफाईदार मराठी बोलू लागली. जर्मनीत राहून व्याकरणाचे नियम घोटून झाले होतेच. मराठी वातावरणात राहून तिचा शब्दसंग्रहसुद्धा व्यापक होत गेला.
डॉ. काथारीना किन्ले या लाईप्तिस्ग विद्यापीठातल्या विदुषी आणि संतसाहित्याच्या विशेष अभ्यासक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं ‘दत्त संप्रदाय’ हा विषय तिच्या पदव्युत्तर प्रबंधासाठी निवडला होता. पुण्यातल्या दत्त मंदिरांसमवेत औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर या श्रद्धास्थानांना भेट देऊन तिनं अभ्यासाची व्याप्ती वाढवली. अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंना तिनं या काळात भेट दिली. भांडारकर इन्स्टिटय़ूटमध्ये बसून तिनं हे संदर्भ, माहिती, पदं संकलित केली. त्यांचं जर्मन भाषांतर करून तिनं या संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. तिचा प्रबंध ‘रास्ते वाडय़ातील दत्त मंदिर, रास्ते कुटुंबाचा इतिहास आणि धार्मिक परंपरा’ हा जर्मन-मराठी अनुबंधातला एक सांस्कृतिक ठेवा आहे. अडेलं त्यानंतरही भारतात येतच राहिली. २००४ ते २००८ च्या काळात दिल्ली, पुणे आणि मुंबई ही तिची वास्तव्याची स्थानं असत. तिथे ती त्या भाषा ऐकत, बोलत, अनुभवत राहिली, आत्मसात करत गेली.
हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांवर आजमितीला तिचं प्रभुत्व आहे आणि गेली सतरा वर्ष ती लाईप्तिस्ग विद्यापीठात आधी मराठी आणि आता प्रामुख्यानं हिंदी शिकवते आहे. (कारण मराठी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.) मात्र मराठीशी असलेले खास ठेवणीतले अनुबंध तिनं जपले आहेत. पण इथेच अडेलं थांबली नाही. ‘सांगत्ये ऐका!’ हे हंसा वाडकर यांचे आत्मकथन. अरुण साधू यांनी शब्दांकित केलेलं. ‘राजहंस’ प्रकाशननं १९७० मध्ये ते प्रकाशित केलं. अडेलंनं या मौलिक मराठी पुस्तकाचं जर्मनमध्ये भाषांतर केलं आहे. २००३ मध्ये अडेलंनं हे भाषांतर हाती घेतलं आणि अत्यंत चिकाटीनं ते २०२० मध्ये पूर्ण केलं. मध्यंतरी त्याचं इंग्लिश भाषांतरही आलं, पण तिनं जिद्द सोडली नाही. मराठी पुस्तकाच्या जर्मन भाषांतरात द्रव्यार्जन होणं दुरापास्तच, पण निदान ते छापून येण्याची संयुक्त जबाबदारी आपल्या भारत सरकारचं संस्कृती मंत्रालय आणि ‘Literaturforum Indien e.V ’नं उचलली.
हे संपूर्ण पुस्तक म्हणजे मराठी-जर्मन भाषांतराचा वस्तुपाठ आहे. हा खरं तर एक रंजक प्रबंध आहे. जर्मन वाचकाला वाचताना कुठे अडखळायला होईल, कुठे ठेच लागेल, कुठले शब्द अगम्य वाटतील, कुठल्या संकल्पना उलगडून सांगाव्या लागतील, याचा समांतर अभ्यास अडेलंनं केलेला आढळतो. या भाषांतरात सविस्तर तळटिपा आहेत. उदा. ‘केशरबाई’मधील ‘बाई’ किंवा विनायक‘राव’ हे आदरदर्शक संबोधन, देवदासी, कलावंतीण, भावीण हे उल्लेख, अशा अनेक संज्ञा तळटिपांद्वारा सुस्पष्ट केल्या आहेत. हिंदी, मराठी आणि संस्कृतमधल्या अवघड शब्दांचे अर्थ सांगणारी मोठी शब्दसूची पुस्तकाच्या शेवटी दिली आहे. शिवाय जर्मन शब्दांची उदाहरणं देऊन मराठी शब्दांचे उच्चार कसे करावेत याची एक सारणीही पुस्तकात आहे. याशिवाय हंसाबाईंच्या १९३६ ते १९६८ या काळातल्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेणारी पूरक अशी चित्रपटसूची या पुस्तकात आहे. पुस्तकात अनेक व्यक्तींचे (उदा. विश्राम बेडेकर, अमिया चक्रवर्ती, हिमांशू राय, भालजी पेंढारकर) नामोल्लेख आले आहेत, त्यांची समुचित ओळख करून देणारी विस्तृत सूची भाषांतराच्या अखेरीस आहे. मीरा कोसाम्बी, आशीष राजाध्यक्ष, चंद्रकांत मांढरे, सुझी थारू यांच्या पुस्तकांचा धांडोळा घेऊन अडेलंनं सूची परिपूर्ण केल्या आहेत. त्यामुळे हे ओघवतं, रसाळ भाषांतर संदर्भसमृद्ध झालं आहे.
या पुस्तकासाठी कुणी, कशी मदत केली हे ऋणनिर्देशात नमूद केलं आहे. त्यात प्रोफेसर नितीन गुप्ते, अरुण साधू अशी मातब्बर नावं आहेत. तर प्रास्ताविकात प्रत्यक्ष भाषांतर प्रक्रियेवर काही विचार मांडले आहेत. या पुस्तकाचा उपसंहारही तितकाच वाचनीय आहे. त्यात अडेलंनं मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जुन्या भारतीय चित्रपटसृष्टीवर दीर्घ भाष्य केलं आहे. त्यात गेल्या शतकांतील मराठी स्त्रियांच्या आत्मकथनाचा पट रेखाटून अडेलंनं त्यांच्या कथनशैलीत, घटनांच्या मांडणीत घडत गेलेल्या बदलांचं विश्लेषण केलं आहेच, शिवाय त्या कथानकांच्या केंद्रस्थानी येणाऱ्या ‘स्व’चं सबलीकरण कसं होत गेलं, पुरुषाच्या छायेतून स्त्रीचं आत्मकथन कसं स्व-तंत्र होत गेलं, याचाही आत्मीयतेनं मागोवा घेतला आहे. हंसा वाडकर यांचं व्यक्तिचित्रण अडेलंनं तीन पातळय़ांवर केलं आहे- एक आत्मकथनकार म्हणून, एक अभिनेत्री म्हणून आणि पुरुषप्रधान संस्कृतीतले सामाजिक संकेत आणि मूल्यव्यवस्थेच्या भाराखाली भरडली गेलेली माता आणि पत्नी अशा दुहेरी भूमिकेतली स्त्री म्हणून. हे भाषांतर करताना अडेलंनं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, सातत्यानं, अगदी स्वयंपाकघरात भांडी घासतानाही हंसा वाडकरांचे चित्रपट बाघितले, ती व्यक्तिरेखा नीट समजून घ्यावी म्हणून. ही वचनबद्धता, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती ही जर्मन कार्यपद्धतीची खास वैशिष्टय़ं. तडजोड नाहीच!
या संपूर्ण प्रकल्पातून सामोरी येते तिची संशोधक म्हणून विचक्षण वृत्ती आणि सूक्ष्म तपशिलाकडे लक्ष पुरवण्याची जागरूकता. एकुणातच मला कळलेली अडेलं सजग मराठीभाषक आहे. ती मराठी भाषेचे ध्वनी ऐकते, त्या शब्दांचा पोत तिला कळतो. तिला पु. ल. देशपांडेंचा विनोद कळतो. फास्टर फेणे आणि साने गुरुजींच्या पुस्तकांत ती रमते. किरण नगरकर, दिलीप चित्रे यांना ती भेटलेली आहे. तिनं ‘बनगरवाडी’ आणि ‘बलुतं’ वाचलेलं आहे. ती हिंदी साहित्यही कटाक्षानं वाचते. उदय प्रकाश, मुल्कराज आनंद ते नमिता गोखले!
अडेलं विशुद्ध मराठी बोलते याचं मला मनोमन कौतुक वाटतं. ‘वाहतूक’, ‘रहदारी’, ‘रोचक’ आणि ‘संवेदना’ असे मराठी शब्द तिच्या बोलण्यात सहजपणे येतात. तिच्याच भाषेत सांगायचं झालं तर तिला मराठीतले ‘मऊ मऊ’ शब्द आवडतात- ‘हळूहळू’, ‘उलटंसुलटं बोलणं’ वगैरे. कारण द्विरुक्तीमुळे उच्चारांत एक प्रकारची मृदुता येते आणि ती शब्दांच्या अर्थात संक्रमित होते. तसंच, एखाद्या मुद्दय़ावर भर देताना वापरला जाणारा ‘च’ हा प्रत्यय तिला प्रकर्षांनं आवडतो- ‘मला वेळच नाहीये’, ‘मी आलोच’.. या एका अक्षरात किती गोष्टी अधोरेखित करण्याचं सामथ्र्य आहे, असं तिला वाटतं. शिवाय ‘चालेल’ हा शब्द तिला त्याच्या ध्वनीमुळे आवडतो. ‘चालेल’ असं म्हणताच अडथळे दूर झाल्यासारखं वाटतं आणि ‘अडचण’ हा शब्द उच्चारतानाच काही तरी समस्या निर्माण होण्याची रुजुवात होते, कारण तो उच्चारच अवघड आहे, असं तिचं विश्लेषण आहे. १९९६ मध्ये अडेलंनं मराठीचं बोट धरून महाराष्ट्राच्या राजभाषेच्या संवेदन क्षेत्रात प्रवेश केला. ते नातं दिसामासी अप्रूपाचं, कौतुकाचं होत गेलं. मराठी भाषेबद्दल जिव्हाळा, आपुलकी आणि ममत्व वाटणारी एक अभ्यासक मराठी भाषेचे ऋण अंशत: फेडू पाहते आहे. मराठीचे स्पंद हृदयात जपणारी अडेलं ही आज मराठी भाषेतल्या ‘विलासाची मोगरी’ झाली आहे!