आदिती पिदुरकर
आपल्या करिअर, नोकरी वा व्यवसायात झोकून दिलेल्या, नाव, प्रतिष्ठा आणि पुरेसा पैसाही कमवत असणाऱ्या अनेक विवाहेच्छुक मुलींसमोर आज संभ्रम आहे, भीती आहे आणि चिंताही आहे. आपल्याला आवडतं ते काम, आवडतं त्या ठिकाणीच करायला मिळेल, की नवऱ्याचं घर, नोकरी, व्यवसायाप्रमाणे ते बदलावं लागेल. तिलाच ती तडजोड करावी लागेल की तिच्यासाठी तिचा नवरा ही तडजोड करू शकेल?..
मी शिक्षणानं इंजिनीयर आहे. कॉलेजच्या प्लेसमेंट्सनंतर मी नागपूरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही काळ नोकरी केली, पण कामाचं समाधान लाभेना, म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि कित्येक वर्षांपासून मनात साचलेलं, ‘समाजासाठी काम करायचंच,’ या प्रेरणेनं गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठय़ा सामाजिक संस्थेबरोबर जोडली गेले. गेली पाच वर्ष मी तिथेच काम करत आहे. मला माझं काम आवडतं, त्याचा होणारा दृश्य परिणाम लक्षात येतो, बरोबरीनं माझादेखील सातत्यानं विकास होतो आहे, हे जाणवतं आणि मन:पूर्वक समाधान वाटतं. काही आठवडय़ांपूर्वीच मी २७ वर्षांची झाले. वाढदिवसानंतर अनेकांनी मला विचारलं, की आता लग्नाचं काय?.. घरीदेखील याविषयी चर्चा सुरू झाली. मी लग्नाला तयार आहे. पण मला चिंता वाटते आहे आणि भीतीदेखील. कारण.. रुजत आलेलं माझं इथलं काम मला सोडायचं नाहीये. कुणी विचारेल, की मग अडचण कुठे आहे? अडचण समाजधारणेत आहे. मी मुलगी, तरुणी, स्त्री असण्यात आहे.
लग्नानंतर सासरी जाणं..
लग्नानंतर मुलीनं आपलं घर, कुटुंब आणि त्या घरातील जबाबदाऱ्या सोडून सासरी, नवऱ्याच्या घरी जावं, तिथून पुढे तेच तिचं सासर- म्हणजे घर असणार आहे, अशी प्रथा, मानसिकता अजूनही समाजात रूढ आहे. ती वर्षांनुवर्ष आहे हे मान्य; पण म्हणून, मुलीनंच स्वत:चं घर का सोडावं? आपल्या कुटुंबाप्रति असलेल्या कर्तव्यास तिलांजली का द्यावी? करिअर-नोकरीबाबत तडजोड का करावी? हा माझ्यासारख्या मुलींना सातत्यानं पडणारा, परंतु अद्याप उत्तर न सापडलेला प्रश्न.
असं म्हटलं जातं, की फार पूर्वीच्या काळात मुबलक प्रमाणात जमीन जिथे उपलब्ध आहे, तिथे पती-पत्नी लग्नानंतर आपला संसार सुरू करायचे. जमीन ही स्थावर असल्यामुळे आणि त्याचा व्यवहार करण्याची यंत्रणा त्या वेळी विकसित न झाल्यामुळे, ज्याच्याकडे जमीन जास्त, त्याच्याकडे संसार सुरू व्हायचा. मुलाकडे जमीन कमी असल्यास मुलगा लग्नानंतर मुलीकडे जायचा आणि जीवनातील नव्या पर्वाला सुरुवात करायचा. उत्तरोत्तर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व वाढलं आणि मुलीनंच मुलाकडे कायमस्वरूपी जावं, ही प्रथा समाजात रूढ झाली. परंतु वर्तमानात, जिथे जमिनीचे व्यवहार करणं सुलभ झालं आहे, संपत्ती साठवण्याचे इतर स्रोत उपलब्ध आहेत आणि शिक्षण, आर्थिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ लागलेली असतानाही ही प्रथा का सुरू राहावी?
स्वातंत्र्य; पण लग्नापर्यंतच!
आज नोकरी-व्यवसायासाठी अनेक तरुण-तरुणी घरापासून दूर जातात. मुंबई-पुणे ही शहरं तर अनेकांना आकर्षित करतात. परंतु ‘सासरघरी जायचं’ असल्यानं तरुणींना स्वत:च्या नोकरीचं ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र गमवावं लागतं. पती-पत्नी दोघंही छोटय़ा शहरातील असल्यास, जर तरुणीला मुंबईला आणि तरुणाला पुण्याला नोकरी मिळाली तर अगदी क्वचित अपवाद सोडल्यास त्यांच्यातल्या पत्नीलाच मुंबईतील नोकरीचा पर्याय सोडून पुण्याला नोकरीचा शोध घ्यावा लागतो. माझ्या शेजारी राहाणारी एक प्रेमविवाह झालेली तरुणी. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे हे दोघे. लहानपणापासून एकत्र वाढलेले. शिकता शिकता प्रेम जुळलं. दोघंही इंजिनीयर झाले. त्याला दुबईला नोकरी मिळाली. तीन वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. दरम्यान तिलाही मुंबईतच चांगल्या कंपनीत, मोठय़ा पगाराची नोकरी मिळाली. सध्या ती सासूबरोबर राहते. नवरा लग्नानंतर लगेच दुबईला गेला आणि तो भारतात लगेच परत येणार नाही, हे नक्की झालंय. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळेल का, याची चाचपणी सुरू आहे. कारण तिला नवऱ्याकडे जावं(च) लागणार आहे. याचं कारण तसं गृहीतच आहे. अशा परिस्थितीत नेहमीच ‘अॅडजस्टमेंट’ करावी लागते ती स्त्रीलाच. याचा पाया मुलीच्या लहानपणापासूनच रचला जातो. शिक्षण, मित्रमैत्रिणी, छंद आणि अंतिमत: नोकरी, या साऱ्याचं स्वातंत्र्य मुलीला मिळतं..
पण अर्थात ‘लग्नापर्यंतच’! ‘तुला जे करायचं आहे ते कर. पण लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या, सासरच्या कलानं गोष्टी कराव्या लागतात,’ असं अनेक आई-वडील आपल्या मुलीला बिनदिक्कत सांगत असतात. इतर सर्व बाबतींत मुलीला सूट दिली जाते, परंतु लग्नाचा विषय निघाला, की मर्यादांचा पाढा सुरू होतो. मुलांना मात्र स्वातंत्र्य आणि तेही ‘लाइफटाइम’. मुलींना निवडक स्वातंत्र्य; तेही लग्नापर्यंतच! मग प्रश्न पडतो, की मुली खरंच स्वतंत्र आहेत का? मुली म्हणून करिअर, इच्छाआकांक्षा आणि कर्तव्यांचं (कुटुंब आणि समाजाप्रति) काय? या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून स्वत:ची प्रगती करण्याचा, जीवनविषयक किंवा सामाजिक जाणिवांवर काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा अधिकार मुलींना नाही का? मुलीनं कायमच त्याग करायचा किंवा तडजोड करायची आणि मुलानं लाभ घ्यायचा, याला लग्न म्हणायचं की एखादी ‘वन साइडेड बिझनेस डील’? भौगोलिक विकासातील असमानतेचा आणि खासगी नोकरीपेक्षा सामाजिक कार्याला कमी समजण्याच्या समाजमान्यतेचादेखील परिणाम होतो. मी स्वत: जर पुण्यात किंवा बंगळूरूला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करून ‘सेटल’ होण्याचा निर्णय घेतला आणि तसाच मुलगा हवा, असा आग्रह धरला, तर तो काही प्रमाणात रास्त समजला जाईल. मुलगी ‘मॉडर्न’ आहे, ‘करिअरिस्टिक’ आहे असं मानलं जाईल. पण मी जर गडचिरोलीत राहून पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचं म्हणते आहे, तर त्याला मात्र वेडगळपणा समजलं जाईल! इथे येऊन सेटल होणारा मुलगा हवा किंवा त्यानं इथून त्याचं ‘वर्क फ्रॉम होम’ करावं, किंवा अन्य पर्याय शोधावा, असं जर मी जाहीर केलं, तर ती अवास्तव अपेक्षाच मानली जाईल.
सातत्यानं गृहीत धरणं!
दुसऱ्या एका तरुणीचं उदाहरण पाहूयात. ती ५ वर्षांपासून नोकरी करत आहे. उत्तम काम करत असल्यामुळे तिची प्रगती होतच आहे, परंतु ते काम म्हणजे तिच्यासाठी नुसती नोकरी नाही, तर तिला त्याचा ध्यास आहे, ते तिचं ‘पॅशन’ आहे. घरी लग्नाचं बोलणं सुरू झालं, की मात्र तिला दडपण येतं. तिचं स्वप्न, तिचं करिअर, तिचं काम यांचं काय होणार? कारण आईवडिलांनी ठरवलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीनं एकदम उत्तम आहे. पण या स्थळाचा आग्रह आहे, की तिनं नोकरी सोडावी किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ करावं. ही एकतर्फी त्यागाची अपेक्षा योग्य आहे का? असा तिचा प्रश्न आहे. आणखी एक उदाहरण- माझ्या ओळखीतल्या एका तरुणीनं लग्न केलं. नवरा-बायको दोघांचंही करिअर उत्तम चालू आहे. घरात ‘सपोर्ट सिस्टीम’ही उत्तम आहे. त्यामुळे सगळं चांगलं चाललं होतं. अचानक सासूची तब्येत बिघडली तेव्हा पहिली अपेक्षा सुनेनं सुट्टी घ्यावी ही होती. नंतर तो आजार जेव्हा गंभीर निघाला, तेव्हा तिनं नोकरीच सोडावी, असा जणू फतवाच निघाला. आईच्या आजारपणात मुलानं रजा घ्यावी किंवा घरातल्यांनी एकत्र बसून त्यावर काही तडजोडीचा उपाय शोधावा, हा विचारच कुणी करू नये? की सेवाभाव बाईलाच जास्त जमतो, तीच योग्य रीतीनं काळजी घेऊ शकते, असं गृहीत धरून तिला त्याकामी लावावं? हा कुठला न्याय? खरं तर काळानुसार तरुणांनीही विचार करायला हवा, की त्यांच्या संसारासाठी, बायकोसाठी ते काय देऊ शकतात? व्हॉट ही कॅन ऑफर टू हिज फॅमिली?
अश्विनीला वर्षांला १५ लाख रुपयांचं ‘पॅकेज’ आहे. त्याचबरोबर ती सुगरण आहे, तब्येतीनं ‘फिट’आहे, हुशार आहे आणि ऑफिसमध्ये ५ जणांची टीम लीड करते. वयाच्या २८ व्या वर्षी तिच्याकडे एक चारचाकी गाडी आहे आणि नुकताच तिनं एक फ्लॅट बुक केला आहे. मागच्या महिन्यात अश्विनीला घरच्यांनी एक स्थळ सुचवलं. तिलासुद्धा वाटतंय, की आता तिला आवडेल लग्न करायला. ‘कांदेपोहे’साठी आलेल्या आशीषला तिनं प्रश्न विचारला, ‘‘सो, टेल मी आशीष, व्हॉट डू यू प्लॅन टू ऑफर इन धिस रिलेशनशिप?..’’ बापरे! या प्रश्नावर घरात असं काही वादळ उठलं की विचारायलाच नको! खरं तर हा प्रश्न तरुणींनी भावी नवऱ्याला विचारायच्या आधीच तरुणांनी स्वत:लाच विचारायची वेळ आली आहे. स्त्री आता परावलंबी नाही राहिलेली. ती स्वतंत्र होते आहे, भावनिकदृष्टय़ाही परिपक्व होऊन निर्णय घेते आहे. तिला तिच्या घरापलीकडे ओळख मिळते आहे. हा प्रश्न कधी समाजाच्या मनात आलाच नाही का, की आता कदाचित स्त्रियांच्याही अपेक्षा बदलल्या असतील? त्याही काही वेगळा विचार करत असतील? त्यांच्या काही वेगळय़ा मागण्या असतील?.. आणि का नसाव्यात? या बदलत्या परिस्थितीत जोडीदार म्हणून एक तरुण आपल्या होणाऱ्या बायकोला खरंच काय मूल्यवर्धक गोष्टी देऊ शकतो याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. इथे कुणी हे विचारू शकेल, की हेच तरुणांच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. आजकालच्या मुली, अगदी नोकरी न करणाऱ्यासुद्धा खेडेगावांत किंवा फार सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी यायला उत्सुक नसतातच. त्यामुळे एखाद्याला अशा ठिकाणी काम करत आयुष्य घालवायचं असेल तर त्याच्या समोरही प्रश्नचिन्ह आहे. हे मान्य आहेच; परंतु मुलींच्या बाबतीत हा प्रश्न सध्या प्राधान्याने येतो आहे, कारण मुली आता वेगळं करिअर करू लागल्या आहेत.
मुलांचंही असावं ‘न्यू नॉर्मल!’
आमच्या संस्थेच्या समुदायातीलच डॉ. सूरज म्हस्के या आमच्या मित्रानं वेगळी वाट निवडली आणि थेट ग्रामीण भागात जाऊन सेवाभावी रुग्णालय सुरू केलं. शहरातील आर्थिक भरभराटीचा पर्याय सोडणाऱ्या सूरजला त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी, डॉ. जानकी भेटली. या जोडीच्या अगदी उलट म्हणजे माझी एक मैत्रीण डॉ. हर्षां कुमारी आणि तिचे पती. हर्षांदेखील एका सामाजिक संस्थेत काम करते. या जोडीचं वैशिष्टय़ म्हणजे हर्षांच्या पतीनं तिच्यासोबत ‘शिफ्ट’ होऊन ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वत: निवडला. एकीकडे सूरजबरोबर ग्रामीण भागात, सामाजिक क्षेत्रात आलेली जानकी. तिनं निवडलेला पर्याय हा ‘अपेक्षित’ वाटतो, तर दुसरीकडे हर्षांसोबत आलेला तिचा पती- यांचं उदाहरण मात्र ‘दुर्मीळ’ आहे! अर्थात, दुर्मीळ असलं तरी शक्य आहे आणि मुलांसाठी ‘न्यू नॉर्मल’चा पायंडा पाडणारं आहे. मुलांनी ‘न्यू नॉर्मल’ चा गांभीर्यानं विचार केल्यास आणि तरुण-तरुणींनी एकत्र चर्चा करून ठरवल्यास अनेक मुलींना कामाविषयी वाटणारी अनिश्चितता नक्कीच कमी होऊ शकेल.
एम.डी. असलेली माझी एक डॉक्टर मैत्रीण- जी आदिवासी भागात गेली ३ वर्ष उत्कृष्ट काम करत आहे. पश्चिम घाटात पर्यावरण संवर्धनाचं काम करत असलेली दुसरी एक ‘एम.एस्सी.’ झालेली तरुणी तिथेच राहून काम करते आहे. मराठवाडय़ातील गरजू कुटुंबांतल्या लहान मुलांच्या शिक्षणावर काम करणारी तिसरी इंजिनीयर तरुणी आणि ‘सायकियाट्री’त ‘एम.डी.’ करणारी आणि भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार देऊ इच्छिणारी आणखी एक मैत्रीण.. अशा अनेक तरुणी आहेत, ज्यांना आता त्यांचा जिथे जम बसला आहे तिथेच स्थायिक व्हायचं असेल, तर त्यांना लग्नाच्या बाबतीत सुयोग्य जोडीदार मिळेलच याची खात्री नाही.
व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आणि देशाच्या ‘यंग अँड प्रॉडक्टिव्ह वर्कफोर्स’चा (तरुण आणि कार्यक्षम मनुष्यबळाचा) भाग बनणाऱ्या तरुणींचं प्रमाण वाढतं आहे, ही अतिशय आशादायक आणि आनंददायी बाब आहे. मात्र त्याबरोबर सामाजिक क्षेत्र असो, वा खासगी क्षेत्र; तरुणींचं काम आणि त्यांचं करिअर यालादेखील समान प्राधान्य देणं आवश्यक आहे, अविभाज्य आहे. लग्न झालं, की ती तरुणीच फक्त जागा बदलून नवऱ्याच्या ठिकाणी जाईल, तिथे काम शोधेल, त्यानुसार आपलं करिअर ‘अॅडजस्ट’ करेल वा बदलेल, अशा अपेक्षा ठेवणं आता बदलायला हवं. ते योग्यही नाही आणि वास्तववादीदेखील नाही. तसा बदल काही प्रमाणात होतो आहे, मात्र तो वाढायला हवाय.
दोघंही नोकरी वा व्यवसाय किंवा वेगळं करिअर करत असतील, तर लग्नाचा निर्णय घेताना आणि जोडीदार निवडताना म्हणजे लग्नाच्या आधीच दोघांना सुसंगत असलेल्या ठिकाणाचा विचार व्हायला हवा. कुणाचं काम कुठे आहे आणि कुठे करणं आवश्यक आहे, कुणाच्या कामाची जागा वा प्रकार बदलणं तुलनेनं सोपं आहे, कुणाच्या कामाचा विशेष सकारात्मक सामाजिक परिणाम घडू शकतो आणि त्यामुळे ते अबाधित ठेवावं, आदी बाबींचा, ‘टिपिकल’ दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन विचार करणं, हे आता जरुरी आहे.
दोघांकडून योगदान अपेक्षित!
कोणत्याही नात्यात दोन्ही व्यक्तींकडून प्रयत्न आणि योगदान होणं आवश्यक असतं. लग्न तर दीर्घकाळासाठी जोडलं जाणारं नातं आहे. यात जर नवऱ्याच्या उत्कर्षांसाठी त्याची बायको योगदान देत असेल, तर मग तिच्या उत्कर्षांसाठी त्यानं योगदान द्यायला हवं. त्यामुळे स्त्रियांनाही त्यांच्या स्वधर्माच्या मार्गावर चालणं सुकर होईल आणि एकूणच आपला समाज एका नव्या दिशेनं पुढे जातानाचं चित्र पाहण्याचा आनंद आपल्याला मिळेल.
मी माझ्या कामानिमित्तानं अनेक तरुणींशी चर्चा करत असते. नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या, शिक्षण घेत असलेल्या, अनेक जणी लग्नाच्या वयात आल्यानंतरही नवरा नेमका कसा हवा- इथे पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे विचार करणं अपेक्षित- पुढे त्या काय करणार आणि कुठे राहणार, याविषयी संभ्रमात असतात. लग्नानंतर माझं आयुष्य कसं वळण घेईल याविषयी त्यांच्या मनात प्रचंड असुरक्षितता असते. त्या सगळय़ांच्या मनावर समाजाचं एक अदृश्य दडपण आहे. लग्न तर करायचंय, करिअर किंवा वेगळय़ा वाटेवर चालायचंही आहे, पण मग समाजाला योग्य वयात लग्न होणंही अपेक्षित असतं, अशा वेळी कशाला महत्त्व द्यायचं?
आपल्या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्त्रियांची यादी जर आपण पाहिली, तर त्यातील अनेक जणींना त्यांच्या जोडीदाराचा भक्कम पाठिंबा लाभला. मग त्या मुलींच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत, गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन स्त्रीरोगांवर अभ्यास करणाऱ्या डॉ. राणी बंग असोत किंवा सुधा मूर्ती असोत.. अशी अनेक उदाहरणं आहेतच, मात्र हे केवळ अपवादात्मक न राहता सर्वासाठी कसं साध्य होईल ते बघणं महत्त्वाचं आहे. शेवटी, मुलींची सातत्यानं होणारी घुसमट थांबवायची असेल, तर या प्रश्नावर विचार करावाच लागेल, की लग्न म्हणजे सहकार की लग्न म्हणजे व्यवहार?
