पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सकारात्मक जनादेश’ मिळणार असून विरोधी पक्षशासित राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. भाजप धर्माच्या आधारावर प्रचार करत नसल्याचा दावाही शहा यांनी केला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री शहा यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाने कोणत्याही धर्मावर आधारित प्रचाराचा अवलंब केला नाही. परंतु जर मुस्लीम आरक्षणाच्या विरोधात प्रचार करणे, अनुच्छेद ३७० रद्द करण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचणे आणि समान नागरी कायदा लागू करणे हा धर्मावर आधारित प्रचार असेल तर भाजपने तो केला आहे आणि यापुढेही करत राहील.

निवडणूक आयोगावर विरोधकांनी केलेली टीका म्हणजे त्यांचे येऊ घातलेले नुकसान झाकण्याचा डाव आहे, असे शहा यांनी सांगितले. मतदानाच्या आकडेवारीत गोंधळ, ईव्हीएममध्ये फेरफार आदी मुद्द्यांवर विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेली टीका चुकीची आहे. तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशसह गेल्या काही वर्षांतील विविध विधानसभा निवडणुकांमध्ये समान निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यात भाजपचा पराभव झाला आहे, असे शहा म्हणाले.

हेही वाचा >>>“राजकोट आग प्रकरण म्हणजे मानवनिर्मित आपत्ती”, गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलं

‘मोदींची लोकप्रियता बलस्थान’

पक्ष मोदींवर जास्त अवलंबून आहे का आणि तुलनेने कमकुवत विरोधी पक्षाला त्यांच्या आघाडीचा फायदा होत आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, हे नकारात्मक नसून सकारात्मक मत आहे. गरिबांचे कल्याण असो, सुरक्षित देश असो, अनुच्छेद ३७० रद्द करणे, महिला आरक्षण आणि राम मंदिर असो, भाजपच्या मूळ वैचारिक योजना मोदींनी प्रत्यक्षात आणल्या. त्यामुळे त्यांची लोकप्रियता साहजिकच बलस्थान बनते. ते आमचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व असल्याचे शहा यांनी सांगितले.

‘मणीपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम’

मणीपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मैतेई आणि कुकुी समाजामध्ये विश्वासाची कमतरता दूर करण्यासाठी काम केले जात असून लोकसभा निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया अत्यंत प्राधान्याने वेगवान केली जाईल, अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराचे चक्र थांबवण्यासाठी सरकारकडून कठोर कारवाई करण्याची गरज आहे का, असे विचारले असता शहा म्हणाले, ‘‘मणीपूरमधील घटना हा दंगलीचा किंवा दहशतवादाचा मुद्दा नाही. हा वांशिक हिंसाचाराचा मुद्दा आहे. तो बळजबरीने सोडवला जाऊ शकत नाही.