Bihar Election result 2025 why congress crumbled in Bihar Check 3 reasons : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालाचा बिहार काँग्रेसमधील अनेकांनी आधीच अंदाज बांधला होता, मात्र काँग्रेस इतक्या वाईट पद्धतीने कोसळेल याची कल्पना मात्र कोणीही केलेली नव्हती. एनडीएच्या लाटेपुढे आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनसाठी हा निकाल अविश्वसनिय आणि आश्चर्यकारक राहिला आहे. दुपारच्या १ वाजपर्यंत समोर आलेल्या निकालाच्या आकडेवारीनुसार महाआघाडीतील दुसरा-सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला ४-५ जागांवर आघाडी मिळाली होती, म्हणजेच पक्षाला दोन-अंकी आकडा गाठण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

दिल्ली ते पटना येथील पक्षाच्या काही नेत्यांना याची म्हणणे होते की, पक्षाचे मुख्य मुद्दे जसे की, पूर्वीचे सामाजिक न्याय किंवा सध्याची मत चोरीची मोहीम ही स्थानिक पातळीवर फारशी प्रभावी ठरत नाही. पण असे असले तरी अनेक पक्षांतर्गत टीका करणाऱ्यांना देखील निकाल पाहून धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. मत चोरीच्या मोहिमे वर टीका करत आलेल्या एका नेत्याने, “हे जुळून येत नाहीये” अशी प्रतिक्रिया द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

बिहारमध्ये मोठा पराभव होताना दिसत असताना पक्षाचे नेते या पराभवाची तीन प्रमुख कारणे असल्याचे सांगतात. त्यांच्या मते समाजिक न्यायाच्या मुद्द्यामुळे पक्षाचे उच्च-वर्गाचे मतदार किंवा जे काही शिल्लक होते ते दूर ढकलले गेले. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) आणि मत चोरी मोहिम हे गांधींच्या पसंतीचे विषय असले तरी यांना जनतेकडून कसलाही पाठिंबा मिळाला नाही.

प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरील परिस्थिस्तीचा फीडबॅक मिळत होता पण नेतृत्वाने स्पष्टपणे त्याकडे दूर्लक्ष केले. राहुल गांधी यांच्या जवळच्या लोकांना पक्षाच्या रणनितीबद्दल एवढी खात्री होती की ते त्यानुसारच निवडणुकीला सामोरे गेले.

बाहेरून आलेल्यांमुळे फटका?

त्यातच एनडीएतील भाजपा, जेडीयू, आणि एलजेपी पक्षातून आलेल्या उमेदवारांना पक्षात सामावून घेण्यात आले. “मी किमान असे १० उमेदवार सांगू शकतो ज्यांचे एनडीएशी संबंध होते. मग ते सोनबरशामधील उमेदवार असो किंवा कुम्हरार, नौतन , फारबिसगंज , कुचायकोटे किंवा बलदौर येथील उमेदवार असतील. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट देतोच, पण काँग्रेस आणि गांधी स्वतः भाजपा आणि आरएसएसशी खंबीरपणे लढत होते. आणि जर तुम्ही अशा लोकांना तिकीट द्याल, ज्यांच्या सोशल मीडिया वॉलवर आजही एनडीए नेत्यांबरोबरचे फोटो आहेत तर मग विश्वासर्हता काय उरते?” असे एका नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

बिहारमधील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, पक्षाने मागास आणि अतिमागास समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे ‘पॅराडाइम शिफ्ट’ ठरला आणि यामुळे उच्च-जातीय समर्थक पक्षापासून दूर गेले आणि पक्षाला टार्गेटेड सेक्शनला देखील आकर्षित करण्यातही अपयश आले, यातच त्यांच्यासाठी नितीश कुमार हेच त्यांच्या पसंतीचा पर्याय ठरले.

महिलांसाठी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना जाहीर केली. ही घोषणा निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर करण्यात आली. या योजनेत प्रत्येक महिलेला स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी २१ लाख रूपये, हप्त्यांमध्ये देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच या योजनेचा पहिला १० हजार रुपयांचा पहिला हप्ता १.२१ कोटी महिलांच्या खात्यात जमा देखील करण्यात आला.

राहुल गांधी गेलेच नाहीत…

“राहुल गांधी हे माझ्या जिल्ह्यात ईबीसी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. थोड्याच अंतरावर, ब्राह्मण मतांची बऱ्यापैकी संख्या असलेले एक गाव होते. एका प्रतिष्ठित विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांच्यासह सुमारे ५००० लोक राहुल गांधी गावाला भेट देतील या आशेने वाट पाहत होते. पण त्यांनी भेट दिली नाही. मला असे सांगण्यात आले की राहुल गांधींना तेव्हा सल्ला दिला गेला की ईबीसी परिषदेनंतर एका ब्राम्हण गावाला भेट देणे चांगले ठरणार नाही. हे नाही तर ते असे असू शकत नाही… आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागेल,” असे एका बिहारमधील वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

नरेटिव्ह चुकला?

आणखी एक कारण म्हणजे एसआयआर आणि मत चोरी नरेटिव्हचे अपयश. स्थानिक पातळीवर स्पष्ट फीडबॅक मिळाला होता की लोकांना हे मुद्दे आकर्षित करत नाहीयेत, त्यानंतर त्यानंतर नेतृत्वाने भूमिका काहीशी बदलून त्यात दैनंदिन प्रश्नांशी संबंधित मुद्दे जोडले. पण महत्त्वाचा मुद्दा हा वोट चोरी हाच होता. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप केला. तसेच बिहार निवडणुकीनंतरही आपण अशीच पत्रकार परिषद घेऊ असेही त्यांनी सूचित केले. “आम्हाला विश्वास नाही हे सूचित करणारा तो एक संकेत होता,” असे या नेत्याने सांगितले.

जेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे लक्ष या मुद्द्यांवर होते आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी रोजगार आणि लोकांच्या इतर दैनंदीन प्रश्नांवर भर दिला. “त्यांच्यात एक असा कोणतीही नरेटिव्ह नव्हता. एक-दोन सभा वगळता राहुल आणि तेजस्वी यादव हे एका व्यासपीठावर आले नाहीत. तेजस्वी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केल्यास गैर-यादव मतांचे काउंटर पोलरायजेशन होईल हा काँग्रेसचा विश्वास कदाचित योग्य होता, पण आरजेडी ऐकण्यास तयार नव्हती. अनेक अडचणी होत्या. पण तरीही हा निकाल पूर्णपणे गोंधळात टाकणारा आणि अनपेक्षित आहे,” असे एका नेत्याने सांगितले.