लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आज वैष्णवांचा मेळा भरला. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी मोठ्या भक्तीभावाने पंढरीत दाखल झाले. यावेळी विठुनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या दैवताला भेटल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. एकीकडे हे भक्तीमय वातावरण दिसत असताना दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळातही टीका-टिप्पणीचा नाद पुन्हा एकदा घुमल्याचं दिसून आलं. यंदाच्या वारीत शरद पवार व राहुल गांधी सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, हे दोघेही वारीत दिसून न आल्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व दिंड्या पंढरपुरात दाखल होतात आणि वारीची सांगता होते. यंदाच्या वारीत शरद पवार व राहुल गांधीही सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ते अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “शेवटी ते वारीला आलेच नाहीत. वारीतल्या भगव्या पताकांचा राहुल गांधी व शरद पवारांना इतका द्वेष का आहे?” असा सवाल भारतीय जनता पक्षानं या पोस्टमध्ये केला आहे.

एकेरी उल्लेख करत राहुल गांधींवर टीकास्र

“शरद पवार व राहुल गांधींचे थोडेफार खासदार अपप्रचारमुळे निवडून आले. विशेष व्होटबँक नाराज होईल या भितीने या दोघांनी वारीत येण्याचे टाळले”, असा आरोप भाजपानं केला आहे. यावेळी राहुल गांधींचा एकेरी उल्लेख करत “यापूर्वी विठुरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधीने वारीचे आमंत्रण स्वीकारून देखील वारीत सहभागी झाला नाही, त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला”, अशा शब्दांत भाजपाने टीका केली.

शरद पवारांनाही लगावला टोला

“हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली. मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत… येऱ्यागबाळ्याचे काम नोहे”, असा टोलाही या पोस्टमधून शरद पवारांना लगावण्यात आला आहे.

‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”

“वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी. तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या, मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता”, असाही टोला भाजपानं या दोघांना लगावला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra slams sharad pawar rahul gandhi on ashadhi wari 2024 pmw