आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी हैदराबादची ओळख आता बदलणार आहे. आजपासून १० वर्षांपूर्वी झालेल्या एका करारानुसार आंध्र प्रदेश सरकारनं यासंदर्भातले आदेश दिले असून त्यानुसार आता हैदराबाद शहराच्या ओळखीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. इथून पुढे हैदराबाद आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी राहणार नाही. आता हैदराबाद फक्त तेलंगणा राज्याची राजधानी राहील. त्यामुळे आंध्र प्रदेशाच्या विभाजनापूर्वी गेल्या अनेक दशकांपासून असणारं हैदराबादचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याची ओळख यात मोठा बदल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० वर्शांपूर्वी, अर्थात २ जून २०१४ रोजी प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन त्यातून तेलंगणा हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. मात्र, तोपर्यंतची कित्येक वर्षं या दोन्ही राज्यांमधील सर्व व्यवस्थांचा कार्यभार हैदराबादला केंद्रस्थानी ठेवूनच केला जात होता. त्यामुळे दोन्ही भागांमधील प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर हैदराबादमध्ये केंद्रीभूत होती. या पार्श्वभूमीवर तेलंगणा व आंध्र प्रदेश ही दोन स्वतंत्र राज्य जरी अस्तित्वात आली, तरी त्यांच्यासाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानीच पुढची १० वर्षं कायम ठेवण्यात आली.

१० वर्षांचा करार संपुष्टात!

२ जून २०१४ ते २ जून २०२४ या काळात हैदराबाद संयुक्त राजधानी राहील अशी तरतूद असणारा आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ साली पारीत करण्यात आला. त्यानुसार २ जून २०२४ पासून हैदराबाद फक्त तेलंगणा राज्याचीच राजधानी राहील. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी आंध्र प्रदेश सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या लेक व्यू गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस ताब्यात घेण्याच्या सूचना गेल्या महिन्यातच तेलंगणातील प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार, संबंधित इमारती आणि इतर व्यवस्था ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

“२ जून २०१४ पासून सध्याच्या आंध्र प्रदेशमध्ये असणारं हैदराबाद हे शहर तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठीची संयुक्त राजधानी म्हणून ओळखली जाईल. पण हा कालावधी १० वर्षांपेक्षा जास्त असू नये. ही मुदत संपल्यानंतर हैदराबाद ही फक्त तेलंगणा राज्याचीच राजधानी असेल”, असं आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आता आंध्र प्रदेशची राजधानी कोणती?

दरम्यान, हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी म्हणून कायम करताना २ जून २०२४ नंतर आंध्र प्रदेशनं स्वतंत्र राजधानीची व्यवस्था करावी आणि सर्व सरकारी प्रशासकीय यंत्रणा नव्या राजधानीच्या ठिकाणी हलवाव्यात, असंही या कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता आंध्र प्रदेशकडून लवकरच नव्या राजधानीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

हैदराबाद आणि भाग्यनगर यांचा संबंध काय? भाग्यलक्ष्मी मंदिर कधी स्थापन झाले?

नवी राजधानी जुन्या राजकीय वादांमध्ये अडकली?

आंध्र प्रदेशकडून अद्याप नव्या राजधानीची घोषणा न होण्यामागे तेथील दोन प्रमुख राजकीय पक्षांमधील राजकीय वाद कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. यापैकी वायएसआर पक्षाकडून तीन ठिकाणी राजधानीची प्रशासकीय यंत्रणा असावी, या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यात विशाखापट्टणम येथून कार्यकारी कामकाज, अमरावती येथून कायदेमंडळाचं कामकाज तर कुर्नूल येथून न्यायविषयक कामकाज चालावं अशी त्यांची मागणी आहे.

दुसरीकडे तेलुगु देसम पार्टीकडून विजयवाडा आणि गुंटूरच्या मध्ये असणारी अमरावती हीच एकमेव राजधानी केली जावी, अशी मागणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राजधानीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad cease to be common capital of telangana and andhra pradesh pmw