Protest on Fevourite Bhajan of Mahatma Gandhi: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं भजन म्हणजे ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’. महात्मा गांधींमुळे हे भजन भक्त राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर फक्त परिचितच नाही तर लोकप्रिय ठरलं. या भजनाचे अनेक प्रकार त्यानंतर वेगवेगळ्या गायकांनी गाऊन लोकप्रिय केले. पण या मूळ भजनाच्याच गायनावर पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात तीव्र आक्षेप घेण्यात आला. एवढा की थेट हे भजन गाणंच गायिका देवी यांना थांबवावं लागलं. त्यांनी शेवटी दुसरं गाणं गायल्यानंतरच हा गोंधळ घालणारा जमाव शांत झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटण्यात नेमकं घडलं काय?

पाटण्यातील बापू सभागार ऑडिटोरियममध्ये माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक ज्येष्ठ, आजी-माजी नेतेमंडळी उपस्थित होते. तसेच, ज्यांचा सत्कार केला जाणार होता, असे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरदेखील उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिनकर शोध संस्थान या स्वयंसेवी संस्थेसह या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मैं अटल रहूंगा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चौबे यांच्याव्यतिरिक्त अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री राहिलेले डॉ. सी. पी. ठाकूर, संजय पासवान व शाहनवाज हुसैन हेदेखील यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका देवी यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. आयोजकांनी त्यांना एक भजन गाण्याची विनंती केली. “मला कार्यक्रमात सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. आयोजकांकडून भजन गाण्याची मला विनंती झाली. आम्ही वाजपेयीजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्यामुळे मला वाटलं महात्मा गांधीजींचं आवडतं भजन रघुपती राघव राजाराम गाणं योग्य ठरेल”, असं देवी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

…आणि गदारोळ सुरू झाला!

देवी यांनी भजन गायला सुरुवात केली. भजनाचं पहिलं कडवं सगळ्यांनी शांततेत ऐकलं. पण जशी पुढच्या कडव्याला ‘इश्वर अल्लाह तेरो नाम’ या ओळींनी सुरुवात झाली, तशी समोर बसलेल्या लोकांपैकी एका गटानं गोंधळ घालायला, आरडाओरडा करायला सुरुवात केली. ही जवळपास ५० माणसं होती, असं नंतर प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. “समोरचा गोंधळ पाहून मला लगेच भजन थांबवावं लागलं. अश्विनी कुमार यांनी जमावाला शांत केल्यानंतर मी दुसरं गाणं गायले. पण महात्मा गांधीजींचं आवडतं एक असं भजन, जे जगभरात अत्यंत आदरानं गायलंही जातं आणि ऐकलंही जातं, त्या भजनाविरोधात झालेला गोंधळ पाहून मला आश्चर्य वाटलं. जे घडलं ते दुर्दैवी होतं”, अशा भावना देवी यांनी व्यक्त केल्या.

“ते सगळं पाहून मला शरम वाटली”

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत शाहनवाज हुसैन यांनी खंत व्यक्त केली. “मी माझ्या भाषणात अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य उर्धृत केलं होतं. ते म्हणायचे, छोट्या मनानं कुणी मोठा होऊ शकत नाही. भजनाच्या विरोधात झालेला गोंधळ म्हणजे असहिष्णुतेचा कडेलोट होता. मला ते सर्व पाहून फारच शरम वाटली”, असं शाहनवाज हुसैन म्हणाले.

“जे काही घडलं, ते घडायला नको होतं. सुसंस्कृत समाजात हे असं घडणं अपेक्षित नाही. त्या जमावाला शांत करण्यासाठी मी हीच गोष्ट सातत्याने सांगत होतो”, अशी प्रतिक्रिया अश्विनीकुमार चौबे यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against ishwar allah tero naam words in bhajan at patna program for atal bihari vajpeyee birth anniversary pmw