नवी दिल्ली : केंद्र सरकारने गाजावाजा केलेल्या ‘मेक इन इंडिया’चे धोरण फसल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाने उत्पादन क्षेत्रात चांगली प्रगती केली असल्याचा दावा करत भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा आरोप फेटाळला.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ घोषणा देण्यातच नैपुण्य मिळवले आहे. अर्थकारणात उत्पादन क्षेत्राचा वाटा दिवसेनदिवस कमी होत असून मोदी आर्थिक समस्या सोडवण्यात अपयश ठरले असल्याचाही आरोप राहुल यांनी शनिवारी केला.

नवी दिल्लीतील नेहरू प्लेस भागातील लॅपटॉप दुरुस्त करणाऱ्या दुकानातील दोन तरुणांशी राहुल गांधींनी साधलेल्या संवादाची चित्रफीत काँग्रेसने आणि राहुल यांनी शनिवारी प्रसिद्ध केली.

मेक इन इंडिया’बद्दल प्रश्न

● उत्पादनाने विक्रमी नीचांक का गाठला, तरुणांची बेरोजगारी विक्रमी उच्चांकावर का गेली, चीनमधून आयात दुप्पट का झाली?

● वास्तव विदारक आहे: आपण जोडकाम करतो, आपण आयात करतो, पण आपण उत्पादन करत नाही. चीनला नफा मिळवून देतो.

● केंद्राकडे कोणत्याही नव्या कल्पना नाहीत, मोदींनी हार पत्करली आहे. बहुचर्चित ‘पीएलआय’ योजना देखील हळूच मागे घेतली जात आहे.

● भारताला मूलभूत बदलाची आवश्यकता आहे. आर्थिक सुधारणा आणि आर्थिक मदत देऊन पाठिंब्याद्वारे लाखो उत्पादकांना सक्षम केले पाहिजे.

● आपण इतरांसाठी बाजारपेठ होणे थांबवले पाहिजे. आपण उत्पादनाची क्षमता निर्माण केली नाही, तर आपण इतरांकडून खरेदी करत राहू. ‘मेक इन इंडिया’ धोरणाअंतर्गत देशी बनावटीच्या वस्तूंचे उत्पादन व्हायला हवे. मात्र, इथे फक्त चीन वा अन्य देशांत उत्पादित वस्तूंचे विविध भाग आयात करून ते जोडण्याचे काम केले जाते. स्वत: तंत्रज्ञानाच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणे आणि उत्पादित वस्तूंचे जोडकाम करण्यातील फरक लोकांना माहीत नसल्याने ‘मेक इन इंडिया’ यशस्वी झाल्याचा दावा केला जातो.-राहुल गांधी, नेते, काँग्रेस</strong>