RCB Victory Parade आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. आज त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. बंगळुरुतल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?

“चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. साधारण तीन लाख लोक विधान सौधा भागात जमा झाले होते. मैदानाची क्षमता ३५ हजार इतकीच आहे. आम्हाला वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही जास्त लोक येतील. ज्या ११ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यापैकी बरेच तरुण-तरुणी आहेत.” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर

चिन्नास्वामी स्टेडियम येथील चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही १० लाखांची मदत जाहीर करत आहोत. अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. तसंच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच या घटनेची चौकशी समिती नेमून केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काय म्हणाले?

“चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांशी मी बोललो आहे. तसेच आता मी रुग्णालयात जाऊन जखमींशी संवाद साधणार आहे. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे आत्ता सांगता येणार नाही. आम्ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही आरसीबीच्या विजयी परेडचा कार्यक्रम देखील १० मिनिटांत आटोपला आहे. तसेच सर्व परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत”, असं उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

या घटनेबाबत एका मुलीने काय सांगितलं?

आम्ही मैदानावर विराट कोहली आणि विजयी टीमला पाहण्यासाठी आलो आहोत. मात्र मैदानातील सगळ्या जागा भरल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. तसंच मागेही जाऊ दिलं जात नाहीये कारण बरीच गर्दी या ठिकाणी झाली आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत असं एका मुलीने ANI ला सांगितलं.