राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशात सत्ताधारी भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने एकीकडे सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे विरोधकांनीही राहुल गांधींनी समर्थन देत भाजपाला विरोध तीव्र केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रसारमाध्यमांवर केंद्र सरकार कशा पद्धतीने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, यासंदर्भात संजय राऊतांनी सामनातील आपल्या रोखठोक या सदरातून टीकास्र सोडलं आहे. तसेच, इंदिरा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असताना त्यांना लिहिलेल्या एका पत्राचा संदर्भही संजय राऊतांनी आपल्या लेखात दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सर्व स्तंभ उद्योगपतींनी विकत घेतले तर उरलं काय?”

“इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे ‘अँकर्स’ देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करीत आहेत. जातीधर्मात तेढ निर्माण करीत आहेत. हे घातक असल्याचे निरीक्षण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. भारतीय जनता पक्षाचे राजकीय धोरण इलेक्ट्रॉनिक माध्यमे पुढे नेत आहेत. त्यामुळे माध्यमांचे स्वातंत्र्य हे फक्त मुखवट्यापुरतेच उरले. सध्याच्या राज्यकर्त्यांना त्यांच्यावर केलेली टीका आवडत नाही. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींना सांगून ही सर्व माध्यमे खरेदी करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. देशाचे सर्व स्तंभ उद्योगपतींनी विकत घेतल्यावर उरले काय? हा प्रश्न पडायला हवा”, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

‘पंतप्रधान आता काय करणार?’ संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल; म्हणाले, ‘गंगेत प्रेतांप्रमाणे…!’

आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राऊतांनी इंदिरा गांधींनी नेहरूंना पाठवलेल्या एका पत्राचा उल्लेख लेखात केला आहे. “पंडित गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी ‘नॅशनल हेराल्ड’ हे नेहरूंनी स्थापन केलेले पत्र काही वेळा पंतांच्या सरकारच्या कारभारावर टीका करीत होते. पंत यांना हे आवडले नाही. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांतर्फे ‘हेराल्ड’चे शेअर खरेदी करण्याची मोहीम चालविली होती. इंदिरा गांधी यांनी नेहरूंना पत्र लिहिले आणि म्हटले की, ‘पंतजींना केवळ ‘होयबा’ हवे आहेत. ‘हेराल्ड’ची टीकाही त्यांना खपत नाही. ते ज्यांना ‘हेराल्ड’च्या संचालक मंडळावर घेणार आहेत, त्यातील एक काळाबाजारवाला आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही अनेक गोष्टी चालवून घेत असता, पण ज्या पत्राशी तुमचा संबंध आहे ते काळाबाजारवाल्यांनी चालवावे असे तुम्हाला वाटते काय? तुम्ही पंतजींना ‘हेराल्ड’मध्ये हस्तक्षेप करण्यापासून परावृत्त करावे. ते सरकारी अधिकाऱ्यांचाही उपयोग शेअर खरेदीसाठी, पैसे जमविण्यासाठी करीत आहेत”, असा उल्लेख राऊतांनी लेखात केला आहे.

इंदिरा गांधींच्या पत्राला नेहरूंचं उत्तर

“इंदिरा गांधींच्या या पत्राला नेहरूंनी सौम्य उत्तर देऊन इतकी टोकाची भूमिका घेण्याचे कारण नाही, असा सल्ला दिला. पुढे इंदिरा गांधींनी लिहिले की, ‘आपला तोल गेलेला नाही. अशाने ‘हेराल्ड’मधील प्रामाणिक माणसेही सोडून जातील आणि एक दिवस ते बंद होईल’. ही सामान्य गोष्ट आहे, असे सांगून त्या लिहितात की, मुख्य प्रश्न एकंदरच जी अधोगती होत आहे तो आहे. या गोष्टी लहान असतील, पण याच लहान गोष्टी या कीड लागत असल्याचे द्योतक आहेत. हे सर्व राज्यांत झाले आहे. त्यामुळे काँग्रेसबद्दल लोकांत नाराजी आहे. ही नाराजी नाही असे तुम्ही म्हणू शकता काय?” असंही राऊतांनी पुढे नमूद केलं आहे.

“एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता, जेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं…”, दीपक केसरकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

“सेन्सॉरशिपविरुद्ध लढणारे स्वातंत्र्याचे भोक्ते…”

“आपल्या इतर अनेक दोषांबरोबर ढोंगीपणाची भर घालण्याचे कारण नाही, हे सर्व इंदिरा गांधींनी परखडपणे आपल्या पित्यास म्हणजे पंतप्रधान असलेल्या नेहरूंना लिहिले, पण त्या स्वतः पंतप्रधानपदावर होत्या तेव्हा त्यांनी हे विचार लक्षात ठेवले नाहीत. त्यातूनच पुढे आणीबाणी व वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप आली. त्या सेन्सॉरशिपविरुद्ध जे लढले ते स्वातंत्र्याचे भोक्ते आज सत्तेवर आहेत व त्यांनी तर सगळय़ाच बाबतीत ढोंगाचा अतिरेक केला आहे!” अशा शब्दांत संजय राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena slams pm narendra modi indira gandhi letters to jawaharlal nehru pmw