ओडिशामध्ये झालेला तीन ट्रेन्सचा भीषण अपघात हा देशातला मागील वीस वर्षांमधला सर्वात मोठा अपघात आहे. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले आहेत तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताची सीबीआय चौकशीचीही मागणी होते आहे. तसंच यावरुन आरोप-प्रत्यारोपांचंही राजकारण होऊ लागलं आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुजरातला सगळं महत्त्व दिलं जातं आहे असं म्हणत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी?

“किती लाजिरवाणी गोष्ट आहे की, रेल्वे ट्रॅक, सिग्नल आणि इतर साधनांच्या आधुनिकीकरणासाठी कुठलाही फंड नाही. मात्र अहमदाबाद मुंबई सुपर फास्ट ट्रेनसाठी १ लाख कोटी उसने घेतले जात आहेत. गुजरातला सगळं महत्त्व आहे, बाकी काहीही नाही.” या आशयाचं ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ओडिशामध्ये झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये आत्तापर्यंत २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. जखमींवर रुग्णालयांत उपचार चालू आहेत. एकीकडे हा अपघात कसा झाला? त्यासाठी कोण जबाबदार आहे? तांत्रिक बिघाड झाला होता का? यासंदर्भात सविस्तर तपास केला जातो आहे. आज अपघातानंतर सुमारे ५० तासानंतर या मार्गावरुन पहिली मालगाडी रवाना झाली.

सामनातूनही मोदी सरकारवर टीका

“मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. २८८ प्रवाशांचा बळी घेणारा आणि ९००च्या वर प्रवाशांना जखमी करणारा हा अपघात कसा घडला याची प्राथमिक कारणे आता समोर येत आहेत. पुढील तपासात आणखी तपशील समोर येईल, पण शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघाताने आजही देशातील रेल्वे प्रवास असुरक्षित असून रेल्वे प्रवाशांचे जीवन क्षणभंगूर, बेभरोसे असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vba leader prakash ambedkar ask question to modi government regrading odisha train accident scj
First published on: 05-06-2023 at 10:55 IST