Swati Maliwal attacks Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमी पक्षाने कॅबिनेट मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर ‘आप’च्या माजी नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडले आहे. आतिशी यांच्या पालकांनी संसदेवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या अफझल गुरूची फाशी रद्द करण्यात यावी, यासाठी लढा दिला होता, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आहे. “दिल्लीसाठी आज मोठा दुःखद दिवस आहे. ज्यांच्या कुटुंबियांनी अफझल गुरूला फाशी देऊ नये यासाठी मोठा लढा दिला, त्याच कुटुंबातील एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री पद देण्यात येत आहे”, अशी पोस्ट मालिवाल यांनी एक्सवर टाकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वाती मालिवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले, “आतिशी यांच्या आई-वडिलांनी अफझल गुरूला जीवनदान मिळावे यासाठी माननीय राष्ट्रपतींना दयेचा अर्ज पाठविला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अफझल गुरू निर्दोष होता. तसेच राजकीय षडयंत्रापोटी अफझल गुरूला अडकविण्यात आले आहे, असाही त्यांचा दावा होता.”

हे वाचा >> अफझल गुरूच्या फाशीबाबत ओमर अब्दुल्ला यांचे धक्कादायक विधान; म्हणाले, “आमच्या हातात असतं तर…”

“आतिशी मार्लेन या फक्त नावापुरत्या मुख्यमंत्री राहणार आहेत. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी जोडला गेलेला आहे. आता देवच दिल्लीचे रक्षण करो”, अशीही टीका मालिवाल यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे.

स्वाती मालिवाल यांचा एक व्हिडीओ एएनआयने पोस्ट केला आहे. त्यातही त्यांनी हीच टीका केली आहे.

मालिवाल यांना लाज-शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा

स्वाती मालिवाल यांच्या टीकेनंतर आता आम आदमी पक्षाचे प्रतोद दिलीप पांडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “स्वाती मालिवाल यांना आम आदमी पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मागावी”, असे आव्हान त्यांनी दिले आहे. मालिवाल यांनी राज्यसभा तर ‘आप’कडून घेतली. मात्र त्या भाजपाची भाषा बोलत आहेत. जर त्यांना थोडी तरी लाज-शरम असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि भाजपाकडून तिकीट मागावे, असेही पांडे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा >> अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

अफझल गुरूला कधी फाशी झाली?

१३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११.४० वाजता पाच दहशतवादी जुन्या संसदेच्या आवारात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी संसदेत शंभरहून अधिक खासदार, मंत्री उपस्थित होते. जवळपास ३० मिनिटे गोळीबार सुरू होता. या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ लोक शहीद झाले. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरूला अटक करण्यात आली होती.

२६ सप्टेंबर २००६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरुला फाशी देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ९ फेब्रुवारी २०१३ साली त्याला फाशी देण्यात आली. याआधी अफजल गुरुने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता. मात्र तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हा दयेचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. त्याच्यावर तिहार तुरुंगातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman whose family fought for afzal guru made delhi cm swati maliwal attacks atishi marlena kvg