पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. दिंडोरी या ठिकाणी त्यांनी भारती पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा काँग्रेसकडे वळवला. काँग्रेसची सत्ता आली तर ते अर्थसंकल्पातला १५ टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं. तेवढ्यात एक शेतकरी कांद्यावर बोला अशा घोषणा देऊ लागला. त्यानंतर त्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणत होते नरेंद्र मोदी?

“आम्ही देशात सरकार म्हणून जेव्हा योजना तयार करतो तेव्हा जात-पात धर्म पाहात नाही. ती योजना सगळ्यांसाठीच असते. सगळ्यांना योजनांचा लाभ मिळतो. मात्र काँग्रेसची नियत कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. नाशिक ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे त्यामुळे मी तुम्हाला विषय सांगतो आहे. काँग्रेसचा विचार असा आहे की देशातलं सरकार जे बजेट तयार करतं त्या बजेटमधला १५ टक्के भाग अल्पसंख्याकांसाठी ठेवावा.” दिंडोरीतल्या भाषणांत मोदी हे बोलत होते तेवढ्यात समोरच्या गर्दीतून घोषणा ऐकू आली कांद्यावर बोला.

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते तितक्यात समोरुन घोषणा आली, “कांद्यावर बोला.. कांद्यावर बोला.” या शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या. त्यानंतर मोदी एक क्षण थांबले, समोरुन मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. भारतमाता की जय या घोषणाही दिल्या. तसंच पुढे त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं.

हे पण वाचा- नरेंद्र मोदींचा मोठा दावा, “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणारच, हे घडल्यावर मला…”

धर्माच्या आधारे आरक्षण मिळू देणार नाही

धर्माच्या आधारावर बजेटचा एक हिस्सा मुस्लिम समाजासाठी असावा असं काँग्रेसला वाटतं आहे. मात्र मी हे होऊ देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असंही नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले. तसंच धर्माच्या नावावर आरक्षणही दिलं जाणार नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे. वंचितांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. मोदी त्यासाठी चौकीदार म्हणून बसलो आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

शेतकरी बांधव कधीही मला विसरणार नाहीत

माझे शेतकरी बांधव मला कधीच विसरणार नाहीत. काँग्रेस काळात शेतकऱ्यांसाठी खोटी पॅकेजेस जाहीर व्हायची. तुम्ही सांगा एक रुपया तरी मिळाला का ? आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांचं हितच पाहिलं आहे. कांदा उत्पादन आणि द्राक्षं यांच्यासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. आमचं सरकार असं आहे ज्या सरकारने पहिल्यांदा कांद्याचा बफर तयार केला. आधीच्या सरकारांनी अशी व्यवस्था केली नव्हती. मागच्या सिझनमध्ये सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. तसंच ५ लाख मेट्रिक टनचा बफर आम्ही तयार करतो आहोत. मागच्या दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्के वाढली आहे. दहा दिवसांपूर्वींच आम्ही कांदा निर्यातबंदी हटवली आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi speech in nashik one person slogan about onion know what happened scj