उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीय. आज राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ५५ मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. याच दरम्यान आज सकाळी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. यामध्ये त्यांनी तुरुंगामध्ये कैद असणारे आझम खान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्याबरोबरच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला मिळालेला जामीन अशा अनेक विषयांवर भाष्य केलंय. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये रामपूरमध्येही मतदान पार पडत असून येथून सपाच्या तिकीटावर आझम खान निवडणूक लढवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आझम खान तरुंगाबाहेर यावेत असं अखिलेश यांनाही वाटत नसल्याचं योगींनी म्हटलं आहे. “ते बाहेर आले तर अखिलेश यांची खुर्ची धोक्यात येईल,” असा दावा योगींनी केलाय. अखिलेश यांनाच या प्रकरणांसंदर्भात विचारलं पाहिजे. आझम खान किंवा अन्य लोकांना जामीन देण्यासंदर्भातील प्रकरणं ही न्यायालयीन आहेत. यामध्ये राज्य सरकारची काहीच भूमिका नसून जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असंही योगींनी म्हटलंय.

अखिलेश यादव यांच्याकडून योगी आदित्यनाथ केवळ वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन करत असल्याची टीका करण्यात आली होती. यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी, “जनतेने यांना उद्घाटन करण्याच्या योग्येतेचंही ठेवलेलं नाहीय,” असा टोला लावलाय. “७० वर्षांमध्ये १२ सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यात आली. मागील पाच वर्षांमध्ये ३३ नवीन कॉलेज आम्ही उभारलीयत त्यापैकी १७ कॉलेज सुरु झाली आहेत. ७० वर्षामध्ये दीड एक्सप्रेस वे बनवलाय. आम्ही पाच वर्षांमध्ये ७ नवीन एक्सप्रेस वे तयार केले. अखिलेश यांनी १८ हजार लोकांना घरं मंजूर केली मिळालं एकालाही नाही. मात्र आम्ही ४३ लाख लोकांना घरं दिली आहेत,” असं योगी म्हणाले.

कर्नाटकमधील हिजाब वादावर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी देशातील कारभार हा संविधानानुसारच चालणार असं म्हटलंय. आपण आपले धार्मिक विचार देश आणि येथील संस्थांवर लादू शकत नाही, असंही योगींनी स्पष्ट केलंय. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही. लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असं योगी म्हणालेत. भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा योगींनी ट्विटरवरुन दिलाय. ‘गजवा-ए-हिन्द’चं स्वप्न पाहाणाऱ्यांनी असं म्हणत योगींनी हिजाब वादामध्ये विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्यांना टोला लगावलाय.

भाजपा विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही या विरोधकांनी केलेल्या आरोपांवरही योगींनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. भाजपाने आपलं लोक संकल्प कल्याण पत्र जारी केलं आहे. या संकल्पाला इतर कोणाताही पर्याय नाहीय. भाजपाने आपल्या संकल्प पत्रामध्ये राष्ट्रवाद, सर्वांचा विकास आणि गरिबांच्या कल्याणाचा उत्तले खेलाय. ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. पंतप्रधान मोदींनी देशाच्या राजकारणाचा अजेंडा बदललाय, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आधी देशामध्ये जात, धर्म आणि कुटुंबाच्या आजूबाजूला राजकारण फिरायचं. आता देशामधील राजकारण हे विकास, चांगली सरकार, गरीबांचं कल्याण, गाव, महिला, शेतकरी आणि तरुणांच्या विषयावर होतंय, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

३०० जागा जिंकण्याच्या आपल्या दाव्यावर योगी आदित्यनाथ ठाम असल्याचं या मुलाखतीमधून पुन्हा दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व, जनतेच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार आहे. सध्याची निवडणूक ही ८० विरुद्ध २० अशी झालीय. पहिल्या टप्प्यातील मदतानानंतरच सपा, बसपा आणि काँग्रेस निराश असून भाजपा प्रचंड बहुमतासहीत सत्तेत येणार असल्याचं भाकित योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat to post yogi claims akhilesh does not want azam khan out of jail scsg