दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात आप नेत्यांच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने आता आम आदमी पार्टी (आप)चे गोवा राज्यातील अध्यक्ष अमित पालेकर आणि इतर काही नेत्यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात समन्स जारी केले आहेत. ईडीने या सर्वांना २८ मार्च रोजी तपास यंत्रणेच्या गोव्यातील पणजी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्लीतील कथित घोटाळ्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपच्या गोव्यातील नेत्यांना का बोलावले? जाणून घेऊ यात.

ईडीने बजावले समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला त्यांनीच ईडी न्यायालयात काल आव्हान दिले होते, विशेष म्हणजे त्याच दिवशी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातील घोटाळ्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपचे गोव्यातील नेते अमित पालेकर आणि काही इतरांना समन्स बजावले. फेब्रुवारी २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत पालेकर हे AAP चे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते. AAP नेत्याने नंतर इंडियन एक्सप्रेसला यासंदर्भात माहिती दिली. मनी लाँडरिंग प्रतिबंध (पीएमएलए) प्रकरणात चौकशीसाठी ईडीने त्यांना पणजी कार्यालयात बोलावले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. पालेकर व्यतिरिक्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर गोव्यातील एका मतदारसंघातून २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणूक लढवलेले नेता आणि आपकडून भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका नेत्यालाही बोलावले होते.

हेही वाचाः विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?

दिल्ली-गोवा नेमका संबंध काय?

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ईडीने आपल्या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातून मिळणाऱ्या कमाईचा AAP मोठा लाभार्थी आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू हेसुद्धा ईडीच्या बाजूनं दिल्ली कोर्टात उपस्थित होते, केजरीवाल यांनी २०२२ च्या पंजाब निवडणुकीसाठी दक्षिण ग्रुपमधील काही आरोपींकडे १०० कोटी रुपयांची मागणी केली, असाही त्यांनी आरोप केलाय. तसेच दक्षिण ग्रुपमधील ४५ कोटी रुपये AAP ने २०२२ च्या निवडणुकीसाठी त्यांच्या गोवा प्रचारात वापरले होते. तपास एजन्सीच्या दाव्यानुसार, हा पैसा चार मार्गांनी गोव्यात आला. AAP ने गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी चेरिअट प्रॉडक्शन्सची स्थापन करण्यात आली होती. कंपनीच्या विक्रेत्यांची तपासणीत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना चेरिअट प्रॉडक्शन्सकडून “पार्ट कॅश, पार्ट बिल” पेमेंट मिळाल्याचे आढळले होते, असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उदाहरणार्थ, मेसर्स ग्रेस ॲडव्हर्टायझिंगचा कर्मचारी इस्लाम काझी याने कथितपणे पैसे मिळाल्याचा ईडीकडे खुलासा केला. त्याला कथितपणे हवालाद्वारे ६.२९ लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले होते. तसेच हे पैसे त्याने मुंबईच्या मालाडच्या उपनगरी भागातील एका हवाला ऑपरेटरकडून गोळा केले होते. २०२० पासून चेरिअटचे कर्मचारी असलेले आणि नंतर AAP च्या निवडणूक प्रचारासाठी फ्रीलान्सर म्हणून सामील झालेल्या चनप्रीत सिंगला विजय नायरच्या OMLकडून निधी मिळाला. ईडीच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्रमुख कटकारस्थान आणि दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी म्हणजेच विजय नायर, राजेश जोशी आणि काही AAP नेते चनप्रीत सिंग यांच्याशी असलेले खोल संबंध प्रस्थापित करतात.

‘आप’च्या गोवा प्रमुखांनी आरोपांचे केले खंडन

आपचे अमित पालेकर यांनी मात्र ईडीचे आरोप फेटाळून लावलेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात कोणताही बेकायदेशीर पैसा पाठवण्यात आल्याचे अद्यापही सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडलेला नाही, अमित पालेकर यांनी राज्यातील सहकारी कोणत्याही एजन्सीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ईडी आपच्या विरोधात पुरावे तयार करीत आहे. एजन्सीकडे त्याच्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी काहीही पुरावे नाहीत,” असंही ते म्हणालेत. इंडियन एक्स्प्रेसशी पुढे बोलताना पालेकर म्हणाले की, कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीसाठी पैसे मिळाले नाहीत. आम्ही जो काही खर्च केला तो आमच्या स्वत:च्या खिशातून केला होता आणि त्याचा हिशेब आहे. खरे तर भाजपाने निवडणुकीच्या काळात प्रचंड पैसा खर्च केला. आमच्याकडे पैसे नव्हते हाच आमचा दोष होता. तरीही आम्ही दोन मतदारसंघात विजयी झालो. भाजपाप्रमाणे पैसा खर्च केला असता तर निवडणूकच जिंकली असती. छोट्या राज्यातील इतर AAP नेत्यांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केजरीवाल मोठा पर्दाफाश करणार

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. जेव्हा ते समोर येतील तेव्हा ते तथाकथित दारू घोटाळ्यातील सत्य उघड करू, असंही त्यांनी पत्नी सुनीता यांच्यामार्फत सांगितले. अरविंद केजरीवाल २८ मार्चला कोर्टात सर्व काही उघड करतील. दारू घोटाळ्यातील पैसा नेमका कुठे आहे हेसुद्धा ते देशाला सांगतील, असंही एका पत्रकार परिषदेत सुनीता म्हणाल्या होत्या.