श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणी नंतर आता पाकिस्तानातही त्याच मार्गाने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी वीजेच्या उपलब्धतेबाबत पाकिस्तानमध्ये केव्हाच आणीबाणीसारखी परिस्थिती गेले काही दिवस बघायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळनंतर वीजेच्या वापराबाबत अनेक निर्बंध पाकिस्तान सरकारने घातले आहेत. असं असतांना सोमवारी एक मोठं संकट पाकिस्ताववर आदळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी सकाळी काय झाले?

महागाई आणि विविध संकंटांनी घेरलेला पाकिस्तान हा सोमवारी साखरझोपेतून जागं झालं असतांना आलेल्या संकटाने हादरला. पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये बिघाड होत ११७ ग्रीड हे ठप्प झाली. त्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर, कराची या प्रमुख शहरांसह जवळपास संपुर्ण पाकिस्तानमधील वीजपुरवठा खंडीत झाला.

पाकिस्तानचे ऊर्जामंत्री यांनी ७ वाजून ३४ मिनिटांनी widespread breakdown in the grid अशा आशयाचे ट्वीट देशातील वीज पुरवठा ठप्प झाल्याची माहिती दिली.

काय परिणाम झाला?

ANI ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील ९० टक्के आर्थिक केंद्रांना याचा फटका बसला आहे, या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. वीज नसल्याने खास करुन मुख्य शहरातील दैनंदिन व्यवहारही हे ठप्प झाले आहेत.

सकाळी वीजप्रवाह ठप्प झाल्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करत काही तासांत काही प्रमुख शहरांतील काही भागात वीजप्रवाह सुरळीत सुरु करण्यात आल्याचं नंतर जाहीर करण्यात आलं आहे. असं असलं तरी अजुनही पाकिस्तानच्या अनेक भागात वीज नाहीये.

पाकिस्तानात वीजेची आणीबाणी का आहे?

पाकिस्तान सरकारने संध्याकाळ नंतर वीजच्या वापरांवर मोठे निर्बंध घातले आहेत. विशेषतः रात्री १० च्या आतच लग्न समारंभ कार्यक्रम पूर्ण करावे , सर्व कार्यालये ही सूर्यास्तानंतर सुरु रहाणार नाहीत अशा अनेक वीज बचतीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. गेली अनेक वर्षे वीज क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक न करणे, वीजेची वाढती मागणी, वीज पुरवठ्याची सदोष यंत्रणा यामुळे पाकिस्तानात गेली काही वर्षे भारनियमन हे नित्याचे झाले आहे. विशेषतः बलुचिस्तानसारख्या भागाला याचा मोठा फटका बसला आहे.

सुमारे १३ हजार मेगावॅट पेक्षा जास्त वीजेची मागणी पाकिस्तानमध्ये असतांना सध्या जेमजेम नऊ हजार मेगावॅट ही उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सक्तीचे भारनियमन तेही काही तासांचे हे केले जात आहे. त्यात अनेकदा मागणी एका भागातून अचानक वाढत असल्याने ग्रीड फेल होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

सोमवारी जसं संपुर्ण पाकिस्तानात वीजेच संकट निर्माण झाले होते तशीच परिस्थिती ही ऑक्टोबर महिन्यात उद्भवली होती. तेव्हाही देशातील वीज पुरवठा पूर्णपणे सूरळीत होण्यास २४ तासांपेक्षा जास्त अवधी लागला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why in pakistan facing electricity problem why there is power failure incident in pakistan on monday asj