महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय सध्या धगधगत आहे. आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील हे सरकारला अल्टीमेटम देत आहेत. तर, सरकारला कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यायचे आहे. किमान सरकारकडून तरी तसे सांगण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. काही लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांच्या वंशावळीतील कुटुंबीयांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र ‘सगेसोयरे’ शब्दामुळे सध्या घोळ सुरू असून, २१ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा फिसकटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विषय काय आहे?

तर विषय असा आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर त्यांचे आंदोलन चिघळले. त्या ठिकाणी जरांगे पाटील यांन उपोषण केले. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी सरकारमधील मंत्री, निवृत्त न्यायाधीश जमले आणि त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारतर्फे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनात ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील, त्यांच्या रक्तातील सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ, असे सांगण्यात आले.

हे वाचा >> ‘सोयरे’ शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ; गिरीश महाजन, “तर आरक्षण देता येत नाही…”

मात्र, २१ डिसेंबर रोजी झालेल्या चर्चेदरम्यान सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्र्यांनी सोयऱ्यांना आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाने आपापली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

पेच कसा निर्माण झाला?

सरकारच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, सोयरे म्हणजे ‘व्याही’. जर मुलाचे (आरक्षणास पात्र असलेल्या) लग्न इतर जातीतील मुलीशी झाले असेल, तर मुलीकडची मंडळी व्याही किंवा सोयरे आहेत. त्यांना आरक्षण कसे देणार? तर जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की, मराठवाड्यातील मराठा समाजाचे नातलग विदर्भ आणि इतर भागात आहेत. ज्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून आहेत. त्यामुळे सरकारने आश्वासन देताना ‘रक्तातील सगेसोयरे’ हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावे.

सगेसोयरे किंवा सोयरे म्हणजे कोण?

कृ. पां. कुलकर्णी लिखित मराठी व्युत्पत्ती कोशात सोयरा, सोयेर या शब्दांचे अर्थ दिले आहेत. सोयरा म्हणजे ‘नातेवाईक, पाहुणा, आप्त’. मराठी शब्दकोशातही सोयरा शब्दाचे असेच अर्थ आहेत. लग्नामुळे झालेला आप्त; नातेवाईक. सोयरा शब्दाला सोयराधायरा, असेही काही ठिकाणी म्हटले जाते. तसेच ग्रामीण भागात लग्न जुळविताना सोयरीक जुळवणे, असेही म्हटले जाते. मराठवाड्यात सोयरीक हा शब्द बऱ्यापैकी वापरात आहे.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगातही सोयरे

सोयरे किंवा सोयरा हा शब्द मध्ययुगीन काळातील अनेक रचनांमध्ये आढळतो. संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हा अभंग लोकप्रिय आहे. त्यातही सोयरी, असा शब्द आलेला दिसतो. वृक्षवल्ली यांच्यापासून आपल्याला अनेक फायदे आहेत. म्हणून तेच आपले सगेसोयरे असून, त्यांची सोयरी सुखकर असल्याचे तुकाराम महाराज या अभंगातून सागंतात. त्याच प्रकारे संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातही सोयरे शब्द आढळतो. “चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥” याचा अर्थ जो मनुष्य सदैव सज्जन लोकांची संगत मिळवतो. त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच सज्जन होतात.

सपिंड आणि विवाहामुळे तयार होणारे नातेसंबंध

मराठी विकासपीडिया या संकेतस्थळावरील सामाजिक संकल्पना व संज्ञा या विभागात नातेसंबंधाची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. सपिंड आणि विवाहोदभव, असे सामान्यपणे दोन नातेसंबंध विशद करण्यात आले आहेत. “नातेसंबंधांची सुरुवात बीजकुटुंब या आप्तगटांत होते. नातेसंबंधांचे क्षेत्र जसे वाढते, तशी आप्तगटांची व्याप्तीही वाढत जाते. बीजकुटुंबानंतर विस्तारित किंवा संयुक्त कुटुंब, भावकी किंवा घराणे, कुळी व गोत्र, जात व जात-पुंज, जात-समुच्चय इ. आप्तसमूह महत्त्वपूर्ण असतात. त्याशिवाय समूह न बनलेले; पण समूह बनण्याची क्षमता असणाऱ्या सग्यासोयऱ्यांचे नातेसंबंध व्यक्तीच्या जीवनावर नियंत्रण ठेवतात”, असे या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

“सपिंड व विवाहाद्वारे असे दोन्ही बाजूंचे असले तरी समाजात एकाच प्रकारच्या नातेसंबंधास जास्त प्राधान्य देण्यात येते. वंशसत्ता, नामकरण व वारसा हक्क ठरविण्यासाठी पितृप्रधान समाजात पुरुषक्रमाचे नातेसंबंध (आप्त) जास्त महत्त्वाचे असतात. जात व जातपुंज अशा व्यापक नातेसमूहांचे विवाह नियमन हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. केवळ जातीतच विवाह मान्य असल्याने जातीचे सभासद हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नातेसंबंधी (आप्त) असतात”, अशी नातेसंबंधाबाबतची व्यापक माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

जात ही वडिलांकडून मुलांना मिळते; आईकडून नाही

भारतातील कुटुंबव्यवस्था ही पुरुषप्रधान पद्धतीची आहे. वडिलांची जात त्याच्या मुला-मुलींना मिळत असते. सर्वोच्च न्यायालयानेही यासंबंधी अनेक वेळा निकाल दिलेले आहेत. आंतरजातीय विवाह झाले तरी आईची जात मुलांना मिळत नाही. त्यामुळेच कुणबी दाखले देताना सोयऱ्यांना म्हणजे पत्नीकडील नातेवाइकांना हे दाखले देणे कायद्याच्या विरोधात जाईल, असे जरांगे पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळातील गिरीश महाजन यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांचे हितचिंतक आणि प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनीही आपली व्यवस्था पुरुषप्रधान असून, आईची जात मुलांना लावल्यास मोठा घोळ होईल, असे सांगून जरांगे पाटील यांना सावध केले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी हा मुद्दा समजावून सांगताना माजी मंत्री आणि दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांचे उदाहरण दिले. विमल मुंदडा या अनुसूचित जातीमधून येतात. त्यांनी मारवाडी समाजातील व्यक्तीशी लग्न केले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला पित्याची जात लागली. विमल मुंदडा या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. विमल मुंदडा यांचा २०१२ साली दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युपश्चात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या मुलाने आईची जात लावली जावी, यासाठी न्यायालयीन लढाई लढली; मात्र त्यांना आईची जात मिळू शकली नाही, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

पेच कसा सुटणार?

सगेसोयरे शब्दाचा अर्थ त्याची व्याप्ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळी असली तरी कायद्याने काही गोष्टी ठरलेल्या आहेत. जात वडिलांकडून मिळत असल्यामुळे बीजकुटुंब महत्त्वाचे मानले जाईल. जरांगे पाटील यांना सरकारने दिलेले आश्वासन नेमके काय होते? किंवा जरांगे यांची मागणी व्यवहार्य आहे का? ती कायद्याच्या कसोटीवर टिकणारी आहे का? याचा विचार करूनच पुढचा निर्णय होण्याची चिन्हे दिसतात. त्यामुळे नियमाच्या चौकटीत बसवून पेच सोडवावा लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is meaning of sage soyare word maratha reservation manoj jarange patil and maharashtra government discussion failed kvg