नेहमीच जेतेपदाच्या शर्यतीत असणारा संघ, चेपॉकचा बालेकिल्ला अभेद्य राखणारा संघ या सगळ्या गोष्टी यंदाच्या हंगामात धुळीस मिळाल्या. महेंद्रसिंग धोनीचा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची अवस्था गलितगात्र अशी झाली आहे. कोणीही यावं आणि हरवून जावं अशी त्यांची गत झाली आहे. बुधवारी पंजाबविरुद्धच्या लढतीत पराभूत होताच चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा महिनाभर बाकी असतानाच चेन्नईने गाशा गुंडाळला आहे.
चेन्नई सुपर किंग्सवर इतकी नामुष्की का ओढवली? बाकी संघांच्या तुलनेत चेन्नईचं चाक गाळात का रुतलं याचा घेतलेला आढावा.
पॉवरप्लेमध्ये कासवछाप कामगिरी
टी२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेची सहा षटकं ही तुफान फटकेबाजीसाठीचा परवाना मानला जातो. ३० गज वर्तुळाच्या बाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे असल्याने फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी मिळते. बाकी संघ पॉवरप्लेच्या षटकांमध्ये किमान ७० आणि जास्तीत जास्त ९० ते १०० धावा करण्याचा संघांचा कल आहे. या सहा षटकात जास्तीत जास्त धावा केल्या तर नंतरच्या षटकात धावगती मंदावली तर फार नुकसान होत नाही. पॉवरप्लेमध्ये भरपूर धावा करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्याचं संघांचं धोरण असतं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवरप्लेचा उपयोग करून घेणं आवश्यक असतं. चेन्नईला ना प्रथम फलंदाजी करताना ना धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेचा उपयोग करून घेता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईत चेन्नईला नमवण्याची किमया केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १९७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पॉवरप्लेमध्ये केवळ ३० धावा केल्या आणि तीन विकेट्स गमावल्या. राजस्थानविरुद्ध चेन्नईला पॉवरप्लेमध्ये केवळ ४२ धावाच करता आल्या. दिल्लीविरुद्धही चेन्नईला पॉवरप्ले कामगिरी सुधारता आली नाही. चेन्नईने ४६ धावाच केल्या आणि ३ विकेट्सही गमावल्या.
१८० च्या पुढे लक्ष्य की चेन्नईचा पाय खोलात
फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या, फलंदाजांना धार्जिणे नियम, दणकट आकाराच्या बॅट्स यामुळे आयपीएलमध्ये संघ १८०चा टप्पा सातत्याने ओलांडताना दिसत आहेत. दोनशे धावा करूनही त्या पुरेशा होत नाहीयेत. असं असताना चेन्नईला १८०पल्याडचं लक्ष्य गाठताच येत नाहीये. १७५-१८०चा टप्पा ओलांडला की चेन्नईविरुद्ध विजय पक्का असं समीकरण झालं आहे. मोठं लक्ष्य गाठण्यासाठी चांगली सलामी मिळणं, भागीदाऱ्या होत राहणं, हाणामारीच्या षटकात फिनिशर मिळणं आवश्यक असतं. चेन्नई सगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलं.
फिनिशर धोनी फिनिश?
महेंद्रसिंग धोनी हा आधुनिक क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नईला फिनिशर धोनीची उणीव भासते आहे. धोनी ४३ वर्षांचा आहे. गुडघ्याच्या दुखापतींनी त्याला सतावलं आहे. २० षटकं विकेटकीपिंग केल्यानंतरही पुन्हा फलंदाजी करणं धोनीसाठी कठीण आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही याला दुजोरा दिला. १० षटकांमध्ये जास्त धोनी फलंदाजी करू शकत नाही. दुखापतींनी त्याच्या हालचालींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे तो लवकर फलंदाजीला येत नाही असं खुद्द फ्लेमिंग यांनीच सांगितलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या लढतीत धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने प्रचंड टीका झाली होती. संघाला गरज असताना धोनी फलंदाजीला येत नसेल तर मग तो का खेळतोय असा सवाल चाहत्यांनी केला. चाळिशीपल्याड गेलेल्या धोनीने निवृत्त व्हावं असाही सूर उमटत आहे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामना जिंकून देण्याचं कठीण काम धोनी वर्षानुवर्ष करत आहे पण यंदा मात्र त्याला सामने फिनिश करता येत नाहीयेत. ११, ६, ४, २६, १, २७, ३०, १६, ३०*, 0 अशी धोनीची कामगिरी आहे. चेन्नई संघासाठी ब्रँड धोनी महत्त्वाचा आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार असला तरी बाकी बाबतीत महेंद्रसिंग धोनीच केंद्रस्थानी दिसतो. चेन्नईने धोनीपल्याडचा विचार केलेलाच दिसत नाही. कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून धोनी संघात नसताना संघाचं प्रारुप काय असेल याचा अभाव चेन्नईच्या नियोजनात जाणवतो आहे.
डॅडी आर्मी ते बच्चा पार्टी
टी२० क्रिकेट हा वेगवान आणि युवा खेळाडूंचा फॉरमॅट. या समजाला छेद देत चेन्नईने तिशी-पस्तिशीपल्याडचे खेळाडू घेऊन जेतेपदं पटकावली आहेत. अनुभवी खेळाडूंच्या फौजेला डॅडी आर्मी असं म्हटलं गेलं. ठराविक वय ओलांडल्यानंतर रिफ्लेक्सेस कमी होतात. प्रचंड उकाडा आणि आर्द्र वातावरणात खेळताना शरीर साथ देत नाही. दुखापतींच्या कुरबुरी सुरू असतात. अशावेळी संघातले बहुतांश खेळाडू तिशीपलीकडचे असणं अडचणीचं ठरू शकतं. डॅडी आर्मी खेळवणं फारसं लाभदायक ठरत नसल्याचं लक्षात आल्यावर चेन्नईने अचानक लहान वयाच्या खेळाडूंना संधी द्यायला सुरुवात केली. ३५प्लस हे प्रमाण झालेल्या चेन्नईने २०वर्षीय शाईक रशीदला पदार्पणाची संधी दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यानंतर चेन्नईने १७वर्षीय आयुष म्हात्रेला ताफ्यात समाविष्ट केलं आणि संधी दिली. दक्षिण आफ्रिकेचा २१वर्षीय युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात घेतलं आणि संधी दिली. सलग अनेक सामने गमावल्यानंतर चेन्नईने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या २३वर्षीय अंशुल कंबोजला संघात घेतलं. वय, अनुभव आणि कर्तृत्व या तिन्ही पातळ्यांवर लहान असणाऱ्या खेळाडूंकडून थेट जिंकून देण्याची अपेक्षा करण्याची चूक चेन्नईने केली. या सर्वच युवा मंडळींसाठी आयपीएलचं व्यासपीठ नवीन आहे. त्यांना इथे स्थिरावून बहरायला वेळ लागेल. अचानक युवा खेळाडूंना संधी देण्याऐवजी चेन्नईने टप्प्याटप्प्याने याआधीच त्यांना संघात समाविष्ट करायला हवं होतं. अंतिम संघाचं समीकरण पक्कं झाल्यावर चेन्नईचा संघ त्यात सतत बदल करत नाही. पण यंदा कुठल्याच खेळाडूला चांगली कामगिरी करता येत नसल्याने चेन्नईने तब्बल २१ खेळाडूंना रिंगणात उतरवलं पण तरीही त्यांचं नशीब बदललं नाही.
चेपॉकच्या खेळपट्टीने दिला दगा
चेन्नईच्या चेपॉकची खेळपट्टी ही संथ, धीमी म्हणून ओळखली जाते. या खेळपट्टीवर भारंभार धावा होत नाहीत. फिरकीवर भर देऊन मधल्या षटकांमध्ये धावांना वेसण घालत विकेट्स पटकवायच्या हे चेन्नईचं धोरण असतं. यंदा मात्र चेन्नई संघव्यवस्थापनाला खेळपट्टीचा अंदाजच आलेला नाही. प्रतिस्पर्धी संघांनी चेपॉकच्या खेळपट्टीचा अचूक अभ्यास करून आक्रमण केलं. मधल्या षटकांमध्ये सामना चेन्नईच्या बाजूने झुकणार नाही याची आखणी प्रतिस्पर्धी संघांनी घेतली. बंगळुरूने २००८ नंतर पहिल्यांदाच चेपॉकवर सामना जिंकला. हैदराबादने पहिल्यांदाच चेपॉकवर विजय मिळवला. संथ, धीम्या खेळपट्टीचं बूमरँग चेन्नईवरच उलटलं.
कोणीच खेळेना, कोणीच चालेना
फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सगळ्याच आघाड्यांवर कोणीच समाधानकारक कामगिरी करू शकलेलं नाही. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामीची जोडी यशस्वी झाली होती. यंदा चेन्नईने कॉनवेला वगळून रचीन रवींद्रला सलामीला आणलं. रचीन आणि ऋतुराज दोघेही धावांसाठी झगडताना दिसले. उशिराने कॉनवेला संधी देण्यात आली पण तोही प्रभाव पाडू शकला नाही. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीकडून चेन्नईला खूप अपेक्षा होत्या पण तो न्याय देऊ शकला नाही. दीपक हुड्डा आणि विजय शंकर या अनुभवी खेळाडूंनीही निराशा केल्याने चेन्नईला चांगली धावसंख्या उभारणं किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं दोन्ही अवघड झालं. गोलंदाजीत एका सामन्यानंतर नॅथन एलिसला बाजूला करण्यात आलं. सॅम करन आणि जेमी ओव्हर्टन दोघेही ना धावा रोखू शकले ना विकेट्स काढू शकले. मथिशा पथिराणाचा सामना कसा करायचा याचं तंत्र आता प्रतिस्पर्धी फलंदाजांनी शोधून काढल्यामुळे तोही निष्प्रभ वाटू लागला. मोठ्या उत्साहाने चेन्नईने लिलावात रवीचंद्रन अश्विनला ताफ्यात समाविष्ट केलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चेन्नईचा हुकूमी एक्का असणारा अश्विन तशी कामगिरी करू शकला नाही. मुकेश चौधरीला संधी मिळाली तेव्हा फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवला. नूर अहमदचा अपवाद वगळता चेन्नईसाठी गोलंदाजी हा कच्चा दुवा ठरला. क्षेत्ररक्षणात चेन्नईने हाराकिरी केली. झेल सोडणं, रनआऊट सोडणं, धावा वाचवणं या कशातही चेन्नई व्यावसायिक संघासारखी कामगिरी करू शकलं नाही. सगळे खेळाडू एकाच वेळी आऊट ऑफ फॉर्म जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.