कोल्हापूर : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यातील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यात पावसाचा दहा दिवस जोर होता. तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. हवेतील उष्मा पुन्हा जाणवू लागला होता. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. यामुळे शहरातील वर्दळ कमी झाली होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता.

त्याचा जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसत होते. पश्चिमेकडे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस तर पूर्वेकडील भागात रिमझिम स्वरूपात पडत राहिला. पावसाने पुन्हा गती घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली. पंचगंगा नदी पातळी १५ फूट ४ इंच होती. तर दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.