कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका क्षेत्रात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यावरून जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दैनंदिन साफसफाई, स्वच्छता व नागरी सुविधा संदर्भात वारंवार मागणी करुनही महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात असल्याने प्रभाग क्रमांक १७ मधील संतप्त नागरिकांनी महापालिकेत येऊन उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांना घेराव घालत प्रश्‍नांची सरबत्ती केली. या भागातील प्रश्‍नांची तातडीने निर्गत न केल्यास जनआंदोलनासह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण छेडण्याचा इशारा माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साईट नं. १०२, आसरानगर, कामगार वस्ती, मळेभाग, ३०० खोल्या आदींसह वृंदावन, सुरभि, निशीगंधा, गुलमोहोर, शिक्षक कॉलनी, सहकारनगर, वडगांव बाजार समिती या भागात दैनंदिन स्वच्छता आणि साफसफाईची वाणवा आहे. त्याचबरोबर या भागात असलेल्या सार्वजनिक शौचलयांची दूरवस्था झाली आहे. शिवाय सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भागातील संतप्त नागरिकांनी माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त प्रसाद काटकर व उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी विशेषत: महिलांनी दोन्ही अधिकार्‍यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मरीआईचा गाडा ओढण्याच्या प्रथेचे पालन

या प्रभागातील सर्वच भागात कर्मचारी नेमले असले तरी दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव आणि गटारींची स्वच्छता केली जात नाही. कचरा उठाव होत नसल्याने भागाभागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या संदर्भात विचारणा करता कर्मचार्‍यांकडून नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जातात. या भागातील साईट नं. १०२ म्हसोबा मंदिर परिसर, एमएसईबी लगत आणि साठे वसाहतीजवळील सार्वजनिक शौचालयांची दूरवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीची मागणी करुनही केवळ आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नाही. साईट नं. १०२ मधील पुनर्वसित झोपडपट्टीतील गटारींमधील सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. याठिकाणचे सांडपाणी जाधव मळा लगत असेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ मोठा खड्डा काढून त्यामध्ये सोडले आहे. मागील २० वर्षांपासून सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आवळे पाणंद ओढ्यापर्यंत सारण गटार किंवा भूयारी गटार करुन निचरा करण्याची गरज आहे.

या परिसरातील गोरगरीब होतकरु विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी सेंटर व लायब्ररीची इमारत उभारली जात आहे. परंतु या आरक्षित जागेलगतच असलेल्या रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक शौचालय या आरक्षित जागेत उभारले जात आहे. ते काम तातडीने थांबविण्याची व अन्यत्र करण्याची गरज आहे. याशिवाय भागातील अनेक कुपनलिका बंद अवस्थेत असल्याने एैन उन्हाळ्यात नागरिकांना वणवण करावी लागत आहे. या सर्व प्रश्‍नांची निर्गत लवकरात लवकर न झाल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारातच उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : तिघा तरुणांच्या जिद्दीतून दुष्काळी ग्रामीण भागात साकारले क्रिकेटचे मैदान!

यावेळी मिंटू सुरवसे, पप्पू दास, चंद्रकांत चौगुले, अजय पाचंगे, संदीप भडंगे, कृष्णा लोहार, राजू होगाडे, शिवाजी लोहार, सुनिल खटावकर, उत्तम बुळगे, एकनाथ पारसे, भिमा बनपट्टे, चंद्रकांत शिंगाडे, बंदेनवाज मोमीन, गणेश भंडारे, प्रकाश बनपट्टे, महादेव आठवले, अमित माच्छरे, अविनाश आवळकर, प्रकाश घाडगे, सखुबाई कुराडे, शमशाद शेख, मंगल ढमणगे, लता एकशिंगे, विमल नेटके, बेबीताई भिऊंगडे, संगीता कसबे, सुलाबाई आवळे, मंगल सुतार, कलाबाई आवळे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unsanitary conditions increased in ichalkaranji people protest ssb