Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यातील मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या मुलाखतदरम्यान गौतम गंभीरने एक असा खुलासा केला, ज्याबद्दल कदाचित विराटच्या चाहत्यांनाही माहित नसेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करत असल्याचे त्याने सांगितले. गौतम गंभीरने बीसीसीआय टीव्हीवरील संभाषणात सांगितले की, २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने प्रत्येक चेंडूपूर्वी शंकराचं नामस्मरण केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने सांगितले की, विराटने कांगारू गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नमः शिवायचा जप केला होता. या कसोटी मालिकेत विराट कोहली एकूण १०९६ चेंडू खेळला, साहजिक इतक्या वेळा भगवान शंकराचं नाव घेतलं. त्याचबरोबर गौतम गंभीरने सांगितले की २००९ मध्ये झालेल्या नेपियर कसोटीत सामन्यादरम्यान तो हनुमान चालिसाचा जप करत होता.

विराट कोहली काय म्हणााला?

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत विराट कोहली म्हणाला, ‘भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील काही क्षणांबद्दल बोलूया. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे गंभीरचे घरच्या मैदानावर २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचे द्विशतक. मी कोपर मारण्याबद्दल बोलणार नाही. कारण मला माहित आहे की कोपर का मारलं गेलं होतं. (गंभीरने शेन वॉटसनला कोपर मारलं होतं). मोठी खेळी साकारावी यासंदर्भात विचारायचं होतं. अशी कोणती गोष्ट होती, जिच्यामुळे तुझी मैदानात एकाग्रता भंग होत नव्हती?’

हेही वाचा – Vinesh Phogat : ‘मी राजकारणात येणार नव्हते, पण जेव्हा…’, विनेश फोगटचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला जाणवले की परिस्थिती…’

‘तू प्रत्येक चेंडूच्या आधी ‘ओम नमः शिवाय’ म्हणत होतास’ – गौतम गंभीर

यावर गौतम गंभीर म्हणाला, ‘चांगला प्रश्न आहे. माझ्याबद्दल बोलण्याऐवजी, मला आठवते की, जेव्हा तू ऑस्ट्रेलियातील त्या मालिकेत खूप धावा केल्या होत्या, तेव्हा तू मला सांगत होतास की तू प्रत्येक चेंडूच्या आधी ‘ओम नमः शिवाय’ म्हणत होतास. यामुळे तुझी एकाग्रता भंग झाली नाही. माझ्याबाबतीत पण नेपियरमध्ये खेळताना तेच घडले होते. मी अडीच दिवस फलंदाजी केली. मला वाटत नाही की मी पुन्हा असे करू शकेन.’

‘अडीच दिवसात फक्त हनुमान चालीसाचे पठण केले’ –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘त्या अडीच दिवसात मी फक्त हनुमान चालीसाचे पठण केले होते. जसे तू ओम नमः शिवाय म्हणत त्यावेळी एकाग्रता भंग होऊ दिली नाहीस. तसेच मी पण हनुमान चालीसा म्हणत संयम राखला. जेव्हा मी त्या मानसिकतेत असण्याबद्दल बोलतो, तेव्हा मी म्हणेन की एखादा खेळाडू त्याच्या कारकिर्दीत फार कमी वेळा त्या मानसिकतेत असू शकतो. कारण त्या मानसिकतेत असणे खूप खास असते.’

हेही वाचा – Saleema Imtiaz : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण आहे? जाणून घ्या

‘त्या अडीच दिवसांसाठी जगापासून दूर होतो’ –

गंभीर म्हणाला, ‘नेपियरमध्ये पाचव्या दिवशी फलंदाजी करताना लक्ष्मणने मला जे सांगितले ते मला आठवते. पहिल्या सत्रानंतर मी परत जात असताना त्यांनी मला विचारले, तुला माहीत आहे का की तू शेवटच्या दोन तासात, षटकांच्या दरम्यान एक शब्दही बोलला नाहीस. मला पटकन आठवले की मी फक्त षटकांच्यादरम्यान फक्त मान हलवत होतो आणि माझा खेळ खेळत होतो. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परत आल्यानंतर मी हनुमान चालीसा ऐकली. त्या अडीच दिवसांसाठी मी जगापासून पूर्णपणे दूर झालो होतो. मला खात्री आहे की तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अनुभव घेतला असेल. जोपर्यंत तुम्ही त्या मानसिकतेत जात नाही तोपर्यंत कसं वाटतं हे समजणार नाही.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir says he listened to hanuman chalisa napier test and reveals virat kohli chanted om namah shivay 2014 aus series vbm