Gautam Gambhir On Team India: गेल्या काही महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता आठवड्याभराच्या आत रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता युवा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसतील. दरम्यान रोहित- विराटने निवृत्तीची घोषणा करताच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बीसीसीआयकडे मोठी मागणी केली असल्याचं म्हटलं जात आहे.

गंभीरने जेव्हापासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारली आहे, तेव्हापासून एक गोष्ट त्याने बजावून सांगितली आहे की, त्याला संघात सुपरस्टार कल्चर नको आहे. त्याने खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी १० नियम तयार केले आहेत. ज्यात खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यापासून ते दौऱ्यावर कसं वागायचं, याचा समावेश आहे.

गौतम गंभीरला युवा खेळाडूंचा संघ हवा आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विराट आणि रोहितला संघाबाहेर करण्यात गंभीरने मोलाची भूमिका बजावली आहे. इंग्लंड दौरा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हा दौरा सुरू होण्यापूर्वीच दोघांनी निवृत्तीची घोषणा केली. संघात युवा खेळाडूंना संधी दिली जाईल, हे विराट आणि रोहितला आधीच माहित होतं. याआधी कोणता खेळाडू संघात कायम राहणार आणि कोणता खेळाडू बाहेर जाणार, हे कर्णधार ठरवायचा. मात्र, मुख्य प्रशिक्षक हे निर्णय घेत असल्याची ही पहिलीच वेळ असावी.

संघाचा मुख्य प्रशिक्षक हा नेहमी कर्णधाराच्या पाठीशी असतो. कर्णधाराकडून चांगली कामगिरी करून घेणं, हे मुख्य प्रशिक्षकाचे काम आहे. मात्र, गौतम गंभीरच्या बाबतीत जरा उलटं आहे. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनसारखे खेळाडू संघाच्या हितासाठी निर्णय घेत होते. मात्र, माध्यमातील वृत्तात असा दावा केला जात आहे की, गंभीरला पराभव टाळण्यासाठी संपूर्ण आझादी हवी आहे.”

रोहितनंतर भारतीय कसोटी संघाची जबाबदारी गिलकडे सोपवली जाऊ शकते. त्यामुळे संघासाठी घेतलेल्या निर्णयाला केवळ जसप्रीत बुमराह आव्हान देऊ शकतो. कारण तो संघातील अनुभवी गोलंदाज आहे. तर दुसरीकडे गिल युवा कर्णधारआहे. त्याला नेचृत्व करण्याचा फार अनुभव नाही. त्यामुळे तो गंभीरचं बोालणं ऐकून घेऊ शकतो. आता गिल आणि गंभीरची जोडी भविष्यात भारतीय संघासाठी कसं काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.