IPL 2025 Remaining Matches: भारतात सध्या तणावपूर्वक वातावरण आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला होता. याचा बदला घेत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ तळं उद्ध्वस्त केली. या हल्लानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्डने भारताला आयपीएलचे उर्वरीत सामने आयोजित करण्याची ऑफर दिली असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या भारतात आयपीएल आणि पाकिस्तानात पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग या दोन स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे जगभरातील दिग्गज खेळाडू भारत आणि पाकिस्तानात आहे. मात्र, दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता. या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील केवळ ८ सामने शिल्लक आहेत. हे सामने यूएईत खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने यूएईकडे विनंती केली होती. मात्र, यूएईने ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. अखेर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पीएसएलचे उर्वरीत सामने खेळवण्यासाठी स्टेडियम मिळत नाही. तर दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डने बीसीसीआयला आयपीएलचे उर्वरीत सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याची ऑफर दिली आहे. ईसीबीचे अधिकारी रिचर्ज गोल्ड यांनी बीसीसीआयची मदत करण्यासाठी होकार दिला आहे.
यासह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील आयपीएलचे उर्वरीत सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याचा सल्ला दिला होता. आयपीएल २०२५ स्पर्धेतील अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. हे पाहता, भारतीय खेळाडू आयपीएल झाल्यानंतर इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका खेळू शकतात. मात्र बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरीत सामने केव्हा आणि कुठे होणार, याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित
आयपीएल २०२५ स्पर्धेत आतापर्यंत ५८ सामने पूर्ण झाले आहेत. गुरूवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील अवघे १० षटक झाल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांना मैदान सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी बीसीसीआयने ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली.