MS Dhoni On Retirement: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या हंगामातील शेवटच्या सामन्यात चेन्नईने ८३ धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या सामन्यातील पहिल्या डावात २३० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला १४७ धावा करता आल्या. हा चेन्नईचा या हंगामातील शेवटचा सामना होता. असं म्हटलं जात होतं की, हा धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. मात्र, सामन्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला एमएस धोनी?

चेन्नईच्या विजयानंतर बोलताना धोनी म्हणाला, “ चांगलं आहे, मी असं म्हणणार नाही की स्टेडियम हाऊसफुल होतं. आम्हाला या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही, पण आज आम्ही चांगली कामगिरी केली. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ४–५ महिने आहेत. त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. शरीर तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे. ”

तसेच तो पुढे म्हणाला, “ खेळाडू फिट असणं गरजेचं आहे. खेळाडूंनी कामगिरीवरून निवृत्ती घेण्याचं ठरवलं, तर काही खेळाडू बाविसाव्या वर्षीच निवृत्त होतील. आता रांचीला जाईन, बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी निवृत्ती घेतोय असं मी म्हणत नाही, पण मी परत येईल असंही म्हणत नाहीये. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. मी विचार करेन आणि निर्णय घेईल.”

चेन्नईचा दमदार विजय

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून फलंदाजी करताना डेवाल्ड ब्रेविसने ५७ धावांची खेळी केली. तर कॉन्व्हेने ५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने ५ गडी बाद २३० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संपूर्ण डाव अवघ्या १४७ धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने ४१ धावांची खेळी केली. तर अर्शद खानने २० धावा केल्या. चेन्नईने हा सामना ८३ धावांनी आपल्या नावावर केला.

या पराभवासह गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण गुजरातकडे अव्वल स्थानी टिकून राहण्याची संधी होती. पण, आता मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांना अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे.