IPL 2025 Winner Prediction MI, RCB, PBKS: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील सामने खेळवले जात आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसाबीने पंजाब किंग्सचा पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवलं आहे. आता मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत आरसीबीविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान सुनील गावस्कर यांनी विजेत्या संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब सुरूवातीनंतर कमालीचं क्रिकेट खेळत थेट प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकेलेला संघ यंदा सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीत आहे. तर पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीत आहेत.
सुनील गावस्कर यांच्या मते, आयपीएल २०२५ ची ट्रॉफी असा संघ उचलेल, ज्याने आजपर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. याचा अर्थ गावस्कर यांना असं वाटतंय की पाच वेळा ट्रॉफीचे जेतेपद जिंकलेला मुंबई इंडियन्स सहाव्यांदा विजेतेपद जिंकू शकणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच पंजाब किंग्जचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर पराभवानंतरही पंजाब किंग्जकडे अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे.
पंजाब आता १ जूनला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनेटरमधील विजेत्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे आणि दुसऱ्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाची गाठ ३ जून रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात बेंगळुरूशी होईल. बेंगळुरू आणि पंजाब दोघेही पहिल्यांदाच विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.
आता गावस्कर यांनी आयपीएल चॅम्पियनबद्दल एक भाकित केलं आहे. गावस्कर म्हणतात की यावेळी बंगळुरू संघ अनेक वर्षांचा दुष्काळ संपवेल आणि विजेतेपद जिंकेल. गावस्कर म्हणाले; “मला वाटतं यावेळी आपल्याला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे. आरसीबीची यंदाची कामगिरीच सांगून जाते, संघ यंदा कोणत्या एका-दोन खेळाडूंवर अवलंबून नाहीये. कोणीतरी एक फलंदाज किंवा गोलंदाज. कोणी ना कोणी खेळाडू पुढे येऊन संघाला विजय मिळवून देत आहे.”
“मला वाटतं याच कामगिरीमुळे आपल्याला दिसतंय आरसीबी फायनलमध्ये का आहे आणि ३ जूनला हाच संघ विजेता ठरू शकतो”, असं गावस्कर इंडिया टुडेला म्हणाले.
अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर संघ त्यांच्या जल्लोषात रमून गेला नाही हे पाहून गावस्कर देखील प्रभावित झाले आणि म्हणाले की ते ट्रॉफी घरी आणण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहेत. गावस्कर याबद्दल सांगताना म्हणाले, “हो, त्यांना माहित आहे की त्यांना अजूनही एक मोठा सामना खेळायचा आहे आणि म्हणूनच ते या विजयाने फारसे उत्साहित झाले नाहीत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा एक मोठा विजय आहे, बाकी राहिलेल्या चेंडूंच्या संख्येच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे कोणताही संघ खूप उत्साहित होऊ शकतो.”
आऱसीबीचं कौतुक करत म्हणाले, “पण कारण या संघाने अंतिम फेरीत पोहोचून अंतिम फेरीत पराभवाची निराशा अनुभवली आहे. त्यांना माहित आहे की त्यांच्यासमोर एक मोठी लढाई आहे, म्हणून ते जास्त उत्साहित झाले नाहीत.”
आरसीबी ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने मागील तिन्ही अंतिम सामने गमावले आहेत. पण यावेळी आरसीबीच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचे दिसून येत आहे. कारण क्वालिफायर १ जिंकणाऱ्या संघांनी आयपीएलच्या इतिहासात १४ पैकी ११ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.