Jasprit Bumrah’s brilliant bowling took 5 wickets : आयपीएल २०२४ मधील २५व्या सामन्यात वानखेडेवर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ७ विकेट्सनी पराभवाची धूळ चारली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने ४ षटकांत २१ धावा देताना आरसीबीच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दमदार गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये त्याने विराट कोहली (३), फाफ डू प्लेसिस (६१), महिपाल लोमरोर (०), सौरव चौहान (९) आणि विजयकुमार वैशाख (०) यांना बाद केले. मुंबई इंडियन्ससाठी, जसप्रीत बुमराहने एकट्याने किल्ला पकडताना अतिशय अचूक गोलंदाजी केली आणि त्याची विविधता देखील आश्चर्यकारक होती. जसप्रीत बुमराहने अचूक यॉर्कर्स आणि बाऊन्सरने फलंदाजांना खूप त्रास दिला. तो आता गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र चहलसह दहा विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.

‘नेहमी यॉर्कर टाकण्याची गरज नाही’ –

सामन्यानंतर बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “तुम्हाला नेहमी यॉर्कर टाकण्याची गरज नाही. अनेक वेळा यॉर्कर तर कधी स्लो बॉल टाकावे लागतात. या फॉर्मेटमध्ये अहंकाराला जागा नाही. तुम्ही १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकता, परंतु काहीवेळा हळू गोलंदाजी करणे आवश्यक असते.”

हेही वाचा – सूर्यकुमार यादवनं यशासाठी श्रेय दिलेली ‘मसल मेमरी’ म्हणजे काय?

‘गोलंदाजांसाठी टी-२० फॉरमॅट खूप कठीण’ –

तो पुढे म्हणाला, “हा टी-२० फॉरमॅट गोलंदाजांसाठी खूप कठीण आहे. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच विविधतेवर काम केले आहे. जेव्हा माझी कामगिरी चांगली होत नव्हती, तेव्हा मी व्हिडिओ पाहिले आणि काय योग्य आहे आणि काय योग्य नाही याचा बारकाईने अभ्यास केले. त्याचबरोबर गोलंदाजीत काय त्रुटी आहेत, त्या समजून घेऊन त्यात सुधारणा केली. त्याचबरोबर तयारी खूप महत्वाची आहे आणि सतत सुधारणा आवश्यक आहे.”

हेही वाचा – जसप्रीत बुमराह सर्वात भेदक गोलंदाज असण्यामागचं वैज्ञानिक कारण

जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, “मी माझ्या संघाची कामगिरी आणि माझ्या कामगिरीवर खूप खूश आहे. मी पाच विकेट घेईन असे वाटले नव्हते. पहिल्या १० षटकांमध्ये विकेट थोडी चिकट होती. तसेच, आजचा दिवस असा होता, जिथे सर्व गोष्टी माझ्या बाजूने जात होत्या. या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे काम सोपे नाही. तथापि, मी या गोष्टींसाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि माझ्या कौशल्यावर काम केले आहे.”

हेही वाचा – MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…

बुमराहची इकॉनॉमी प्रति षटक ६ धावांपेक्षा कमी –

मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जसप्रीत बुमराहची इकॉनॉमी या हंगामात प्रति षटक ६ धावांपेक्षा कमी राहीली आहे. त्यामुळे तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंगादाजांच्या यादीत अव्वल स्थानावार आहे. त्यामुळे सद्या जसप्रीत बुमराहचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. बुमराहने याचे श्रेय त्याचे कौशल्य आणि विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला दिले आहे.