भारताचा रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने आरसीबीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. विराट कोहलीने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानी आहे. यंदाची ऑरेंज कॅपही विराटच्या नावे असू शकते. आऱसीबीचा पुढील महत्त्वाचा सामना चेन्नईविरूद्ध होणार आहे, हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी करो या मरो असेल. पण या सामन्यापूर्वीच्या संघाच्या डिनर पार्टीमध्ये विराट नेमकं काय म्हणाला जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ३५ वर्षीय कोहलीला विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने खुणावत असते, जी पूर्ण करण्याची भूक आहे. यावर कोहली म्हणाला की., “ही अगदी साधी गोष्ट आहे. मला वाटतं, एक खेळाडू म्हणून, आमच्या करिअरलाही पूर्णविराम देणारा दिवस आहे. म्हणून मी सातत्याने आपले काम चोख करत आहे. अरे मी त्यादिवशी असं केलं असतं तर बरं झालं असतं, असे विचार करत मला माझी कारकीर्द थांबवायची नाही. त्यामुळे कोणतंही काम अपूर्ण ठेवत आणि त्याचा नंतर पश्चताप न करण्याबद्दल ही गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की मी असं करणार नाही.”

हेही वाचा- RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुढे काय करणार, याचा विचार करण्यापूर्वी तो दीर्घकाळ विश्रांती घेईल, असे संकेतही कोहलीने दिले. निवृत्तीविषयी बोलताना त्याने शेवटी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे, कोणतीही खंत न बाळगता आपली कारकीर्द संपवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आणि जोपर्यंत तो खेळणे थांबवत नाही तोपर्यंत आपले सर्वोत्तम देण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

विराट याबाबत बोलताना पुढे म्हणाला, “जेव्हा मी खेळणं थांबवेन त्यानंतर बराच काळ तुम्ही मला पाहू शकणार नाही. कारण मी मोठ्या सुट्टीवर जाईन. जोपर्यंत मी खेळत आहे तोवर १०० टक्के प्रयत्न द्यायचे आहेत. हीच गोष्ट मला वाटचाल करण्यासाठी प्रेरित करते.”

कोहली सध्या चालू असलेल्या IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहे, त्याने १३ डावांमध्ये १५५.१६ च्या स्ट्राइक रेटने तब्बल ६६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. १३ सामन्यांत १२ गुणांसह सध्या आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या RCBला या शनिवारी, CSK विरुद्ध महत्त्वाचा सामना खेळावा लागणार आहे. प्लेऑफसाठी शर्यतीत कायम राहण्यासाठी , RCB ला CSK चा नेट रेन रेट मागे टाकण्यासाठी निर्णायक विजय मिळवणे आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा नेट रन रेट अधिक ०.५२८ आहे, तर RCB चा नेट रन रेट अधिक ०.३८७ आहे.

हेही वाचा – RR v PBKS: टॉम कोहलर कॅडमोर गळ्यात नेमकं काय घालून उतरला होता? त्या उपकरणाचा उपयोग काय, जाणून घ्या 

आयपीएलनंतर भारताचा माजी कर्णधार पुढील महिन्यात यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अलीकडेच कोहलीला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याबाबत विचार करायला हवे असे सांगितले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli statement on his retirement plans said once i am done you wont see me for a while rcb ipl 2024 bdg