Rishabh Pant on World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२२ च्या शेवटी, ऋषभ पंत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी स्वत: गाडी चालवत त्याच्या घरी जात होता आणि त्याच दरम्यान त्याचा अपघात झाला. पंतला तंदुरुस्त होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल असे वाटत होते, परंतु सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वैद्यकीय पथक त्याच्या या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. स्टार क्रिकेटर पंत शक्य तितक्या लवकर पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे आणि पूर्ण तंदुरुस्तीच्या दिशेने त्याच्या एकापाठोपाठ एक पाऊल पुढे टाकत आहे. दरम्यान, बातम्या येत आहेत की, ऋषभ पंतने नेटमध्ये सुमारे १४० किमी प्रतितास वेगाने चेंडूंचा सामना करण्यास सुरुवात केली आहे. त्याने त्या चेंडूवर शानदार शॉट मारला. एवढ्या कमी दिवसात त्याची ही फिटनेसमधील सुधारणा पाहून बीसीसीआय देखील याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

हेही वाचा: World Cup 2023: पाकिस्तानचे नखरे अजूनही सुरूच! भारतात येण्यापूर्वी पीसीबीने ICCसमोर ठेवली अट; म्हणाले, “जर सुरक्षेची हमी…”

रेव्हस्पोर्ट्सच्या बातमीनुसार, डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने नेटमध्ये फलंदाजी करताना ताशी १४० किमी वेगाने चेंडूंचा सामना केला आणि त्याशिवाय त्याने यष्टिरक्षणाचा सरावही सुरू केला आहे. ऋषभ पंतने गेल्या महिन्यात थ्रोडाऊन करण्यासही सुरुवात केली होती, परंतु मागील काही आठवड्यांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा वेग वाढला आहे. पंत टीम इंडियात कधी परतणार? याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. टीम इंडियाला येत्या दोन-तीन महिन्यांत आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. विश्वचषकाआधी तो संघात पुनरागमन करणार का? याबाबत ज्या ज्या वेळी त्याच्या बाबतीत कुठलीही माहिती किंवा एखादा व्हिडीओ येतो त्या त्या वेळी माध्यमांमध्ये चर्चा सुरु होते.

हेही वाचा: Asia Cup 2023: के.एल. राहुल-श्रेयस अय्यरचे आशिया चषकात पुनरागमन होणार? सोमवारी BCCI निवड समिती घेणार मोठा निर्णय

आशिया चषक २०२३पर्यंत पंतचे पुनरागमन अशक्य वाटते तसेच, २०२३च्या विश्वचषक स्पर्धेतही तो पुनरागमन करू शकेल, ही आशा सध्या कमी दिसत आहे. पंतच्या अनुपस्थितीत इशान किशनने टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया कप ३० ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच आयसीसी विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. आयसीसी विश्वचषक २०२३चे आयोजन यंदा भारत करणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant has started facing 140 kmph fast balls will he be able to return till 2023 world cup avw