पीटीआय, लंडन

भारतासाठी सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. पण, कर्णधार बनण्याचे माझे स्वप्न कधीच नव्हते. बदलाच्या ओघात हे जबाबदारीचे पद मिळाल्यावर आता सुरक्षित आणि आनंदी संघ संस्कृती निर्माण करण्याचे ध्येय बाळगले असल्याची भावना भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याने बोलून दाखवली आहे. ‘‘भारतीय संघ सध्या संक्रमणावस्थेत असून, पहिल्याच इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यात आम्ही विजयाचा शोध नक्की घेऊ. यासाठी मला अशी संघ संस्कृती निर्माण करायची आहे की संघातील प्रत्येक खेळाडूला सुरक्षित आणि आनंदी वाटले पाहिजे,’’ असे गिलने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अर्थात, नुसते बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण आहे. विशेषत: सर्व स्पर्धा आणि खेळत असलेल्या सामन्यांची संख्या लक्षात घेऊन मी ते करू शकलो, तर माझ्या कर्णधारपदाला अर्थ आहे, असेही गिल म्हणाला. ‘‘खेळाडूंची क्षमता ओळखून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे कर्णधाराचे मोठे काम असते. यासाठी मला रोहित शर्माने स्पष्ट मार्ग दाखवला आहे. तो आक्रमक वाटला नाही. पण, त्याची रणनीती कायम आक्रमक होती. सामन्यापूर्वी तसेच, नंतर तो सहकारी खेळाडूंकडून काय हवे याबाबत प्रत्येकाशी संवाद साधायचा. मला रोहितच्या याच मार्गावर चालायचे आहे,’’ असे गिलने सांगितले.

रोहितच्या रणनीतीमधील आक्रमकता जशी आपल्याला भावली, तशीच विराट कोहलीच्या मैदानावरील सक्रिय भूमिकेनेदेखील मला प्रभावित केले आहे. एक योजना काम करत नसली, तर दुसऱ्याचा उपयोग करायचा ही कोहलीची पद्धत उत्तम होती, असेही गिल म्हणाला.

‘‘आजपर्यंतच्या क्रिकेट प्रवासात माझे वडील माझे सर्वोत्तम मित्र होते. मी प्रत्येक घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा करायचो. कर्णधारपदाची चर्चा मात्र त्यांनी माझ्यापासून दूर ठेवली. पण, जेव्हा कर्णधारपदावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा मात्र आमच्यामध्ये या जबाबदारीविषयी सखोल चर्चा झाली,’’ असे गिलने सांगितले.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची निवड करतानाच निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी बुमरा पाचही कसोटी खेळण्याची शक्यता फेटाळून लावली होती. बुमरा दुखापतीतून बरा होत आहे, अशा वेळी त्याच्यावरील ताणाचे व्यवस्थापन करावे लागेल. वेळोवेळी त्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल. जे सामने तो खेळेल, त्या प्रत्येक सामन्यासाठी तो आमच्यासाठी पूर्ण क्षमतेने उपलब्ध असेल, हेही आमच्यासाठी खूप आहे, असे गिलने स्पष्ट केले.

गंभीर यांच्या शैलीशी जुळवून घेण्याचे आव्हान

●कर्णधार गिलने या वेळी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या शैलीचे वेगळेपण आवर्जून सांगितले. थेट नाही, पण त्यांच्या या शैलीशी जुळवून घेण्याचे आव्हान असल्याचे तो मानतो. गंभीर खूप दृढनिश्चयी आहेत.

●खेळाडूंनी कशा प्रकारची मानसिकता राखावी याबाबत ते आग्रही असतात. त्यामुळे त्यांच्याशी मला जुळवून घ्यावे लागेल, असे गिलने मान्य केले.

इंग्लंड बॅझबॉल क्रिकेट खेळणार की नाही याचा विचार मी करत नाही. कुठल्याही पूर्वकल्पित योजना घेऊन मला उतरायचे नाही. त्यामुळे समोरच्या नियोजनावर आधारित नियोजन करण्यापेक्षा स्वतंत्र नियोजन करायला मला आवडेल. –शुभमन गिलभारताचा कर्णधार.