Virat Kohli Police Complaint: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध शुक्रवारी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावल्यानंतर विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांनी त्यांच्या तक्रारीत आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीसाठी विराट कोहलीला जबाबदार धरले आहे. मात्र, त्यांच्या तक्रारीवर अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

तत्पूर्वी कर्नाटक पोलिसांनी चेंगराचेंगरीबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, आरोपी आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए, आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने आवश्यक परवानगीशिवाय विजयोत्सवाचे आयोजन केले होते.

दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोलँड गोम्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, आरसीबी फ्रँचायझी, केएससीए आणि डीएनए विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(अ) ​​अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरसीबीची पोस्ट पाहिली आणि…

दाखल केलेल्या तक्रारीत गोम्स यांनी म्हटले आहे की, “मी सोशल मीडियावर आरसीबीची पोस्ट पाहिली आणि माझ्या मित्रांसह विजयोत्सव पाहण्यासाठी आलो होते. जेव्हा मी गेट क्रमांक १७ मधून आत जात होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती आणि त्यावेळी माझ्या खांद्याचा सांधा निखळला.”

दरम्यान, भाजपच्या एका शिष्टमंडळाने क्यूबन पार्क पोलीस स्टेशनला भेट देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी

तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे आमदार एन. रविकुमार म्हणाले की, “आरसीबी विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यू आणि त्यामुळे झालेल्या गोंधळाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी माझी मागणी आहे. जर त्यांच्यात नैतिकता, संविधान आणि लोकशाहीचा आदर असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.”

त्यांनी पुढे या सर्व प्रकारासाठी सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला असून ५० ते ६० लोक जखमी झाले आहेत.