Ishan Kishan, IND vs WI 1st Test: भारताचा कर्णधार रोहित शर्माने डॉमिनिका कसोटीनंतर खुलासा केला की, तो सामन्यादरम्यान इशान किशनवर का चिडला होता. इशानने आपली पहिली कसोटी धाव लवकरात लवकर करावी जेणेकरून रोहित शर्मा डाव घोषित करू शकेल अशी हिटमॅनची इच्छा होती. भारताने आपला पहिला डाव ५ विकेट्स गमावून ४२१ धावांवर घोषित केला होता. यानंतर यजमानांचा डाव १३० धावांवरच आटोपला आणि तिसऱ्या दिवशीच सामना जिंकला. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १५० धावांत ऑलआऊट केला होता. हा सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकण्यात भारताला यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पदार्पण सामना खेळत असलेल्या इशान किशनच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. डॉमिनिका येथे सुरू असलेल्या भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या इशान किशनला डावाच्या सुरुवातीला १९ चेंडू खेळूनही एकही धाव करता आली नाही. ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसत होता.

इशान किशनला चाचपडताना पाहून रोहित शर्मा ड्रेसिंग रुममधून इशान किशनकडे धाव घेण्यासाठी इशारा करताना दिसला. मात्र, २०व्या चेंडूवर इशान किशनला आपले खाते उघडण्यात यश आले. त्याने अल्झारी जोसेफच्या षटकात एकच धाव घेतली. खेळाच्या या फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या डावात केवळ एक धाव कडून किशन तंबूत परतला. त्यानंतर लगेचच रोहितने डाव घोषित केला.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “मी फक्त त्याला सांगत होतो की आमच्याकडे डाव घोषित करण्यासाठी फक्त एक किंवा दोन षटके शिल्लक आहेत. मला वाटत होते की इशानने लवकर त्याची पहिली धाव काढावी आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपले खाते उघडावे. त्याने पहिली धाव घ्यावी आणि मग आपण डाव लगेच घोषित करू. तो प्रत्येक वेळी फलंदाजीसाठी उत्सुक असल्याचे मी पाहिले आहे. मात्र, त्याने १९ चेंडू धाव काढण्यासाठी लावल्याने मी खूप निराश झालो.”

हेही वाचा: IND vs WI: अश्विनच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा एक डाव अन् १४१ धावांनी दणदणीत विजय

एक डाव आणि १४१ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय

भारतीय डावाबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालच्या १७१, रोहित शर्माच्या १०३ आणि विराट कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिला डाव ५ बाद ४२१ धावांवर घोषित केला. पहिल्या डावानंतर भारताने २७१ धावांची आघाडी घेतली. यानंतर टीम इंडियाने यजमानांना अवघ्या १३० धावांत गुंडाळत सामना जिंकला. यादरम्यान आर अश्विनने दुसऱ्या डावात ७ विकेट्स आणि संपूर्ण सामन्यात त्याने एकूण १२ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was rohit sharma furious at ishan kishan in the middle of the match revealed himself after the match avw