उन्हाळ्यात आपल्याला सतत काही ना काही थंड पिण्याची इच्छा होत असते. तसेच प्रत्येकाला अशा गोष्टींचे सेवन करायचे असते की, ज्या शरीराला थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत करतील. तर थंड आणि हायड्रेट हे दोन्ही शब्द ऐकल्यावर डोळ्यांसमोर येते ते फक्त नारळाचे पाणी. नारळपाणी हे सामान्यतः हायड्रेटिंग आणि आरोग्यदायी पेय मानले जाते; परंतु आपल्याला ताजेतवाने करणाऱ्या या पेयामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मधुमेह तज्ज्ञ डॉ. शिवा सुंदर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

“नारळपाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासात रक्तातील साखरेमध्ये १०० मिलिग्रॅम/डेसीएल वाढ होते. त्यात पोटॅशियम असते, जे आरोग्यासाठी चांगले असते; परंतु मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते योग्य नाही. व्यायाम करणे आणि नंतर कमी प्रमाणात नारळपाणी पिणे चांगले,” असे डॉ. शिवा म्हणाले.

“विशेष म्हणजे नारळपाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम व इलेक्ट्रोलाइट्स यांसारखे पोषक घटक असतात. ज्यांचे वारंवार डिहायड्रेशन होते अशा लोकांसाठी नारळपाणी सर्वोत्तम आहे. कॅलरीज कमी असल्याने नारळपाणी तुम्हाला ऊर्जादायित्वाचा अनुभव देण्यास मदत करू शकते,” असे आहारतज्ज्ञ सिमरत भुई म्हणाल्या.

नारायण हॉस्पिटल गुरुग्राम येथील आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे म्हणाल्या की, नारळपाण्यात असलेली उच्च प्रमाणातील पोटॅशियम सामग्री रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्यांचा धोका कमी होतो. त्याव्यतिरिक्त डोंगरे यांच्या मते, नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करतात.

पण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते का?

गुरुग्राममधील मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या प्रमुख आणि मुख्य पोषण व आहारतज्ज्ञ परमित कौर म्हणाल्या की, नारळाचे पाणी रक्तातील साखरेची पातळी वाढवते की नाही हे अनेक परिस्थितींवर अवलंबून असते. त्यामध्ये नारळपाणी घेतलेले प्रमाण आणि व्यक्तीची आरोग्य स्थिती यांचा समावेश आहे, विशेषतः मधुमेह असलेल्यांच्या बाबतीत.

नारळाच्या पाण्यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हे घटक समाविष्ट असलेली नैसर्गिक साखर असते. त्यामुळे नारळपाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. एक कप (२४० मिली) नारळाच्या पाण्यात साधारणपणे सहा-सात ग्रॅम साखर असते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI)देखील कमी असतो. याचा अर्थ असा की, उच्च GI असलेल्या पदार्थांच्या तुलनेत, ते रक्तातील साखर हळूहळू सोडते आणि हळूहळू वाढवते,” असे डॉ. कौर म्हणाल्या.

जर तुम्हाला मधुमेह असेल, तर नारळाचे पाणी पिताना त्याचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अतिसेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते, असे कौर म्हणाल्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer drink coconut water raises sugar levels coconut water benefits srk