बहुधा लोक तळलेल्या पदार्थांतील तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्र, टिश्यू पेपरचा वापर करतात. पण, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्ही तळलेल्या पदार्थांतील जास्तीचे तेल काढण्यासाठी टिश्यू पेपर वापरत असाल, तर ते आताच थांबवा. डॉक्टर किरण आर. ढाके यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. ढाके सांगतात, “जेव्हा आपण एखादा पदार्थ तळल्यानंतर तो टिश्यू पेपरवर ठेवतो, तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि तो पदार्थ ओला होतो. त्यामुळे पदार्थाचा कुरकुरीतपणा जातो आणि पदार्थ नरम पडतो. त्यामुळे पदार्थाची चवही बदलू शकते. तसेही डीप फ्राइड फूड आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. वरून ते ठेवण्यासाठी टिश्यू पेपर वापरल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

कसे होते नुकसान?

कित्येकदा आपण तेलकट पदार्थ टिश्यूवर ठेवतो. मात्र, यातील रासायनिक घटक पदार्थात जाऊन ते आपल्या पोटात जातात. टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर त्याची योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जसे की कचरा वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा, जलप्रदूषण व घनकचरा.

आगीचा धोका

डॉ. ढाके यांच्या मते, टिश्यू पेपरमध्ये असलेल्या आम्ल पदार्थामुळे आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. गरमागरम एखादा पदार्थ आपण जर टिश्यू पेपरवर ठेवला, तर टिश्यू पेपर पेट घेण्याची शक्यता असते. टिश्यू पेपरला आग लागल्यावर त्यातून विषारी धूर निघू शकतो; ज्यामुळे वायुप्रदूषण होऊ शकते.

काय करता येईल?

कोणताही पदार्थ हा नेहमी योग्य स्मोकिंग पॉईंटपर्यंतच तळावा; जेणेकरून पदार्थात जास्त तेल शोषले जाणार नाही. पॅन किंवा कढईत कोणताही पदार्थ तळताना छिद्र असलेलाच चमचा वापरा. उदा. झारा; जो आपण सामान्यतः वापरतो. त्याचसोबत पदार्थातील अतिरिक्त तेल काढण्यासाठी तो पदार्थ किचन टॉवेल किंवा विशिष्ट प्रकारच्या कागदावर ठेवा; जेणेकरून त्यातले सगळे तेल शोषले जाईल.

हवाबंद कंटेनरचा वापर

तळलेले पदार्थ साठवायचे असल्यास हवाबंद कंटेनर हा एक सुरक्षित पर्याय आहे. तळलेले पदार्थ ओलसर होऊ नयेत म्हणून ते एकमेकांच्या वर ठेवू नका. मोठ्या डब्यात सुटसुटीत राहतील अशा रीतीने ठेवा.

हेही वाचा >> Navratri Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या…

कागदी पिशव्यांची निवड

कागदी पिशवी ही योग्य निवड आहे. त्या कमी खर्चीक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या असतात. तसेच कागदी पिशव्या जास्त टिकाऊ असतात. तळलेले पदार्थ विशिष्ट कालावधीसाठी साठवण्यापूर्वी किंवा सर्व्ह करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाळवले पाहिजेत. वाळवल्यामुळे अतिरिक्त तेल काढून टाकण्यास आणि अन्नपदार्थाचा ओलसरपणा टाळण्यास मदत होतो. या टिप्स अमलात आणल्या गेल्यास, आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, सातत्य व सौंदर्य टिकवून ठेवता येईल.