याच्याच जोडीने आणखी एका वेगळ्या विषयाकडे जाताना जगभरातील निरनिराळ्या शहरांची फुफ्फुसे असलेल्या जंगलांवर प्रकाश टाकला आहे- डॉ. उल्हास राणे, वैशाली करमरकर (जर्मनी), विश्वास अभ्यंकर (अॅमस्टरडॅम), डॉ. प्रियांका देवी-मारुलकर (पॅरिस) आणि प्रशांत सावंत (लंडन) यांनी. याच विषयाचे विस्तृत साहित्यरूप म्हणजे कवी गुलजार यांच्या झाडांवरील तरल कवितांचा खास विभाग!
यावर्षी पावसाने दगा दिल्याने देशातील अनेक राज्यांना अवर्षणास तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातील अवर्षणग्रस्त प्रदेशांत कशा तऱ्हेने त्याचे नियोजन केले जाते याचा साद्यन्त वृत्तान्त कथन केला आहे डॉ. संहिता जोशी यांनी.. ‘सुबत्तेच्या देशातला दुष्काळ’ लेखात!
ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपटकार सई परांजपे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला अभिनेते नासीरुद्दीन शाह यांच्या संघर्षकाळातील ‘बेबंद दिवसां’चे वर्णन करणारा त्यांच्या आत्मकथनातील अंश- हे या अंकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या अभिनय तसेच लेखकीय आयुष्याला वळण देण्यास निमित्त ठरलेल्या व्यक्तींवर लिहिलेला कृतज्ञता-लेख वाचकांचे कुतूहल जागवणारा आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनीड’ या कादंबरीवर आधारित सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’ या चित्रपटातील अव्यक्त प्रेमत्रिकोण प्रत्यक्षात रवींद्रनाथ आणि सत्यजित राय यांच्याही व्यक्तिगत आयुष्यात कसा निर्माण झाला होता, हे चितारणारा विजय पाडळकर यांचा विलक्षण उत्कट लेख संवेदनशीलांची जिज्ञासा जागृत करणारा ठरावा.
आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने योजलेल्या बडोदा डायनामाइट कटातील सहभागी डॉ. जी. जी. पारिख आणि बच्चूभाई शहा यांच्या आठवणींवर आधारीत लेख अंकाला वेगळे परिमाण देणारा आहे. आयसिसचा अक्राळविक्राळ दहशतवाद जगड्व्याळ रूप धारण करतो आहे. त्याची पाळेमुळे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेणारा विशाखा पाटील यांचा लेख, तसेच पानिपत युद्धात युद्धकैदी झालेल्या मराठय़ांचे पुढे काय झाले, त्यांचे वंशज आज काय करताहेत, याचा मागोवा घेणारा आनंद शिंदे यांचा शोधलेख वाचकांची तृष्णा भागवेल.
कन्नड साहित्याच्या अधिकारी अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी सांगितलेले अनुवादाभव, स्वातंत्र्यपूर्व काळातील तिसरे आगाखान या आगळ्या व्यक्तिमत्त्वाची न्या. नरेंद्र चपळगावकरांनी करून दिलेली ओळख, नाटय़-समीक्षक माधव वझे यांनी फ्रान्समधील ‘अविन्यो’ या नाटकवेडय़ा गावाचा करून दिलेला परिचय, डॉ. रवी बापट यांनी आपल्या लेखनाची केलेली शल्यचिकित्सा, नाटय़-चित्रपट क्षेत्रांतील सौमित्र तथा किशोर कदम, मुक्ता बर्वे, गुरू ठाकूर, प्रसाद ओक आणि जितेंद्र जोशी यांच्या कवितांचा खास विभाग, तरुणाईच्या संगीताची चर्चा करणारे डॉ. आशुतोष जावडेकर, गंधार संगोराम आणि जसराज जोशी यांचे लेख, ‘आर्टुनिस्ट गोपुलु’ हा प्रशांत कुलकर्णीचा एका आगळ्या चित्रकाराचा परिचय करून देणारा लेख, तसेच व्हेनिसच्या बिएनालेची गोष्ट सांगणारा अभिजीत ताम्हणे यांचा लेख, प्राचीन ‘स्मार्ट सिटीज्’वर झोत टाकणारा रवि आमले यांचा लेख, साहित्य आणि जीवन यांचा जैविक संबंध उलगडून दाखवणारा आसाराम लोमटे यांचा लेख, विनायक पाटील यांनी जगावेगळ्या वृक्षाची सांगितलेली कहाणी, त्याचप्रमाणे ज्योतिर्विद आदित्य भारद्वाज यांचे वार्षिक राशिभविष्य अशा वैविध्यपूर्ण साहित्याची मेजवानी यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात आहे.
लोकसत्ता, संपादक : गिरीश कुबेर, मूल्य : १४० रुपये
साप्ताहिक साधना, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : १२० रुपये
सा. साधना युवा, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : ३० रुपये
सा. साधना बालकुमार, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : ३० रुपये
दर्यावर्दी, संपादक : अमोल सरतांडेल, मूल्य : ७५ रुपये
आरोग्य विषय प्रश्नांची सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करणाऱ्या अनेक संघटनामध्ये कार्यरत असणारे डॉ. अनंत फडके यांच्या लेखातून जनआरोग्य क्षेत्राचा आवाका तर कळतोच, पण याच क्षेत्रातील कार्यकर्त्यांची जडणघडण दिसून येते. इतर उद्योगांप्रमाणेच आता आरोग्य क्षेत्रातदेखील गळेकापू स्पर्धेने जोर पकडला आहे. त्यातही औषध जगात तर माफियागिरीचाच प्रत्यय येत आहे. समीर कर्वे यांनी या सर्वाचा पत्रकारीय नजरेतून घेतलेला आढावा मूळातून वाचण्यासारखा आहे.
अवयव प्रत्यारोपणाची आजची गरज आणि अवयवदात्यांची कमतरता यामुळे हे प्रमाण व्यस्त आहे. या परिस्थितीवर प्राजक्ता कासले यांच्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. स्त्री स्वास्थ्य या विभागातील सर्वच लेख अनेक वेगवेगळ्या समस्यांवर प्रकाश टाकणारे आहेत. स्त्रियांमधील व्यसनाधीनता, राइट टू पी, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक हिंसांचा स्त्रीच्या आरोग्यावर होणारा परिणाम दूर करण्यासाठीची समुपदेशनाची गरज अशा विषयांवरील सर्वच लेख उद्बोधक आहेत.
समलैंगिकांचे प्रश्न, इच्छामरणाची समस्या, समाजस्वास्थ्याचा प्रवास, ‘हॅलो’चा लोकल ते ग्लोबल प्रवास अशा अनेक लेखांनी अंकाची शान वाढवली आहे.
वसा, संपादक : प्रभाकर नारकर, मूल्य : १०० रुपये
गिरीश कुबेर यांनी साताऱ्याजवळच्या त्यांच्या माहुली या आजोळच्या आठवणी लिहिल्या आहेत. जुन्या आठवणीतलं गाव मांडताना त्यांनी शेवटी आजच्या काळातलं त्याच गावातलं जगणं मांडून नेमका बदल सूचित केला आहे.
सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे. त्यांनी सिद्धेश्वराच्या महायात्रेची तपशीलवार माहिती देऊन आपलं बालपण त्या यात्रेशी कसं जोडलेलं होतं ते सांगितलं आहे. अरुण साधू यांच्या परतवाडा आणि अचलापूरच्या आठवणी आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातात. विश्वास पाटील यांनी त्यांच्या नेर्ले या गावाचं सुरेख चित्र रेखाटलं आहे. रंगनाथ पठारे, ना. धों. महानोर, मकरंद अनासपुरे यांनी रंगवलेल्या गावच्या आणि अर्थातच लहानपणच्या आठवणी वाचनीय आहेत. सयाजी शिंदे, शिरीष पै, इंद्रजित भालेराव, प्रभा गणोरकर, नागनाथ कोत्तापल्ले, अमृता सुभाष यांनी रहिमतपूर या त्यांच्या आजोळाबरोबरच शूटिंगच्या निमित्ताने कोकणातल्या गावी जडलेलं नातं उलगडून दाखवलं आहे. अशा अनेक मान्यवरांनी आपल्या गावाच्या ऋणानुबंधांबद्दल लिहिलं आहे.
ऋतुरंग, संपादक : अरुण शेवते, मूल्य : २०० रुपये
दशभुजा दामिनी, संपादक : शीतल करदेकर, मूल्य : ६० रुपये
सरकारी तसबिरीत नसलेले बाळासाहेब या लेखातून संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू काहीशा वेगळ्या दृष्टीने मांडले आहेत. जे काम सरकारी तसबिरींनी केलं नाही ते बाळासाहेबांनी केलं. त्यावरच प्रकाश टाकण्यात आला आहे. दिवाळी साजरीकरणाचा आत्ताच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यानिमित्ताने ‘ते दिवस आता कुठे?’ हा अरुण म्हात्रे यांचा, ‘दिवा करजो भाताचा’ हा अरविंद पोहरकर यांचा आणि ‘दिवाळी भोकाच्या पैशाची’ हा अरविंद म्हापणकर यांचा स्मरणरंजनात्मक लेख वाचनीय आहे. नोकरी व्यवसायानिमित्ताने आज बऱ्याच प्रमाणात मराठी माणूस परदेशात आहे. अर्थात सारेच भारतीय सण तेथे साजरे होत असतात. अमेरिकेतली दिवाळीची माहिती रुपाली कदम-राणे यांच्या लेखातून मिळते.
अश्लील विनोद हा खुसखुशीत लेख शिरीष कणेकर यांनी लिहिला आहे. वेदाक्षरांवरील लेख अभ्यासपूर्ण आहे. अंकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इतर दिवाळी अंकात कविता वाचायला मिळतात येथे गजलांची मैफल सजली आहे.
सामना, का. संपादक : संजय राऊत, मूल्य : रु. ८०/-
प्रिय मैत्रीण, संपादक : वर्षां सत्पाळकर, मूल्य : १४० रुपये
कॅनडातले बुटचार्ट गार्डन्स, इंग्लंडमधील ‘कॉम्प्टन एकर्स’ ही उद्यान मालिका, चेरी ब्लॉसमची जपानी बाग, राजवाडे आणि मनमोहक कारंज्यांच्या अकरा बागा अशा विदेशातील बागांची सफर या अंकात उमा हर्डीकर, जयश्री कुलकर्णी, अनामिका बोरकर, पुष्पा जोशी, प्रकाश जाधव यांनी घडवली आहे. देशातील उद्यानशिल्पावर उज्ज्वला गोखले यांनी प्रकाश टाकला आहे. मेक्सिकन, कॅरिबियन समुद्राखालील संग्रहालयाचा चित्रमय सफर नंदा कदम यांनी केली आहे.
प्राचीन जलसंवर्धन आणि त्यानिमित्ताने बांधलेल्या वास्तू ही आपली जलस्मारकंच म्हणावी लागतील. या जलस्मारकांवर अतुल कुळकर्णी, मिलिंद आमडेकर, रजनीश जोशी यांनी विशेष प्रकाश टाकला आहे. बारवांचं सौदर्य, मुघलकालीन जलयोजना कुंडीभंडारा, देवी नदीची कथा यांचा यात समावेश आहे.
उंचावर डोंगरकडय़ावर, कातळावर हवेतच लटकवलेल्या तंबूतल्या अनोख्या कॅम्पिंगची माहिती या अंकात आपल्याला मिळते. मेघालयातील पातळगुहा आणि जंगलाचा एक अदिम अनुभव उष:प्रभा पागे यांच्या लेखात घेता येतो. तर सिक्किममधल्या घरात राहण्याची नवी पर्यटन संकल्पना मानसी आमडेकरांनी वर्णिली आहे. भर शहरात आंतरराष्ट्रीय न्यायालय २ आणि जंगल दोन्ही असणाऱ्या हेगची सफर नरेंद्र चित्रे यांच्या लेखात घडते. एकूणच भटकंतीची दिवाळीच असं वर्णन करावे लागले.
मस्त भटकंती, संपादक : वर्षां सत्पाळकर, मूल्य : रु. १४०/-
वयम, संपादक : शुभदा चौकर, मूल्य : १०० रुपय
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या शिवाजी मंदिराचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने सुर्वणमहोत्सवी कार्यक्रमाचा आढावा शशी भालेकर यांनी घेतला आहे. आघाडीची अभिनेत्री आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्पृहा जोशीच्या मुलाखतीवर आधारित माधुरी महाशब्दे यांचा लेख आवर्जून वाचावा असा आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुलाखतीतून राज्यातील बदलत्या उद्योग वातावरणाची झलक दिसून येते.
आयुर्वेदाशी निगडित विषयांवर मान्यवर वैद्यांचे लेख हा या अंकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणावा लागेल. उत्साही चाळिशीचे रहस्य, मधुमेह, बालरोग दमा, संधिवात अशा अनेक आजारांवरील या लेखांमुळे चांगलेच मार्गदर्शन होते.
गार्गी, संपादक : श्रीनिवास शिरसेकर, मूल्य : रु. १००/-
आवाज, संपादक : भारतभूषण पाटकर, मूल्य : १८० रुपये
आम्ही उद्योगिनी, संपादक : मीनल मोहाडीकर, मूल्य : ५० रुपये
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com
