अहिल्यानगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे शत-प्रतिशत जागा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. किमान दोन तृतियांश जागा मिळण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीत महायुती हवी की नको याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यास सांगितले, अशी माहिती भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (महानगर), दिलीप भालसिंग (दक्षिण) व नितीन दिनकर (उत्तर) यांनी आज, सोमवारी पत्रकारांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तिघा जिल्हाध्यक्षांनी हा दावा केला. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राजेंद्र काळे, अशोक गायकवाड, महेश नामदे, बाळासाहेब भूजबळ आदी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नितीन दिनकर यांनी शिर्डीमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘एमआयडीसी’तील गुंतवणुकीची माहिती दिली तर अनिल मोहिते यांनी नगरच्या विस्तारित ‘एमआयडीसी’ची जागा हस्तांतरित झाली असली तरी तांत्रिक अडचण जाणवत आहे. अनेक मोकळे भूखंड पडून आहेत, उद्योजकांनी जागा घेतल्या. मात्र, तेथे उद्योग सुरू केले नाहीत, त्यामुळे अशा जागा इतर प्रकल्पांना उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. नगर शहरातून जाणारा पुणे-छत्रपती संभाजीनगर दुमजली रस्ता लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुपा ‘एमआयडीसी’तील दहशत संपवली
पालकमंत्री विखे यांनी सुपा औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात बैठका घेतल्या. त्या माध्यमातून आमच्याकडूनच खडी, कामगार साहित्य घ्या, यासाठी निर्माण केली जाणारी दहशत भाजपने संपवली, असा दावाही जिल्हाध्यक्ष मोहिते, दिनकर व भालसिंग यांनी केला.
वैद्यकीय महाविद्यालय शहरातच
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीनंतर ते कोठे होणार, यावरून वादंग निर्माण झाले होते. मंत्री विखे यांनी जिल्ह्यासाठी हे महाविद्यालय मंजूर झाल्याचे सांगितले होते. मात्र महानगर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी प्रथमच पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय शहरासाठी मंजूर झाले आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे. हे महाविद्यालय शहरातच होईल. भाजपने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हे महाविद्यालय शहरातच व्हावे, त्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयात जागा उपलब्ध आहे, याकडे मोहिते यांनी लक्ष वेधले.