सोलापूर : अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या आराम बसला अपघात होऊन त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर अन्य आठजण जखमी झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर, अक्कलकोटच्या अलीकडे कर्जाळ गावाजवळ हा अपघात झाला.
रस्त्याच्या पुलालगत थांबलेल्या एका मालमोटारीला पाठीमागून आलेल्या भाविकांची खासगी आराम बस आदळली आणि हा अपघात घडल्याचे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. यात दोन्ही वाहनचालकांचा दोष आढळून आल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात पुणे पोलीस दलातील कर्मचारी गौरीशंकर कुलकर्णी (वय ५१) आणि आकाश मुकेश जाधव (वय ३२, रा. पुणे) या दोघांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये शेखर सिद्धाराम जाधव (वय ३१), संगीता मुकेश जाधव (वय-५५), वृंदा अरुण उंडाळे (वय-६३), सुनीता शेलके (वय-४५), मीना अरुण दरेकर, ज्योतिबा गावंडे, शकुंतला सोनवणे आणि बसचालक महेश पवार (वय २८, सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे. काही जखमींवर अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात, तर अन्य काही जखमींवर सोलापुरातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सोलापूरहून अक्कलकोटमार्गे कर्नाटकातील सेडम येथे सिमेंट भरण्यासाठी एमएच १२ एसएफ ३४५५ ही मालमोटार निघालेली होती. वाटेत ही मालमोटार कर्जाळजवळच्या पुलालगत थांबलेली होती. त्यावेळी पुण्याहून खासगी आराम बस (एमएच १२ व्हीटी ११७२) ३० भाविकांना घेऊन अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाली होती. ही बस कर्जाळजवळील पुलावर आल्यानंतर पुढे उभे असलेल्या मालमोटारीवर पाठीमागून आदळली आणि हा अपघात झाला.