अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – Video: …अशी झाली अतिक अहमदची हत्या! पुन्हा प्रवेश, पुन्हा कोसळले दोघं; न्यायालयीन आयोगाने उभा केला तोच प्रसंग

काय म्हणाले अमोल मिटकरी?

जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. यांच जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली गेली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब केला जाईल, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा – जपान दौरा अर्धवट का सोडला? महाराष्ट्रातील सत्तांतराच्या चर्चेवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं सूचक विधान, म्हणाले…

संजय राऊतांचंही शिंदे सरकारवर टीकास्र

दरम्यान, याच मुद्द्यावून आज सकाळी संजय राऊत यांनीही शिंदे सरकावर टीकास्र सोडलं होते. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास व्हायचं कारण काय? बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. मात्र फडणवीसांनी त्या योजनेवर स्थगिती आणली. नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते होते, पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असे ते म्हणाले होते.