Supreme Court on Maharashtra Satta Sangharsh : जवळपास ११ महिन्यांपासून देशभरात चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट या दोघांनीही सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील राखून ठेवलेला निकाल आज दिला. सुप्रीम कोर्टाने एकंदरीत राज्याच्या विधीमंडळात घडलेल्या अनेक गोष्टींवरून ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली, राज्यपालांनी केलेल्या चुका तसेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची केलेली घाई यावर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रीम कोर्टाने शिंदे गटावर ताशेरे ओढले असले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार मात्र वाचलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा ठाकरे गट पुढे काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी माहिती दिली.

आमदार अनिल परब म्हणाले की, विधीमंडळात शिंदे गटाने केलेलं कृत्य हे बेकायदेशीर होतं असं कोर्टानेच म्हटलं आहे. आता कोर्टाच्या निकालाची प्रत घेऊन आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे जाणार आहोत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधासभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. कारण आता वेळ काढण्याची परिस्थिती नाही.

हे ही वाचा >> Maharashtra Satta Sangharsh Live: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक…!”

अनिल परब म्हणाले, आता याप्रकरणी सर्व पुरावे उपलब्ध आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत आहे. या गोष्टी आम्ही विधानसभा अध्यक्षांसोर ठेवू. त्यांना आता केवळ या गोष्टी तपासून निर्णय घ्यायचा आहे. व्हिप अंतिम झाला आहे. सुनील प्रभू हे शिवसेनेचे व्हिप आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी निकाल देण्यासाठी डोकं लावून विचार करण्याची आवश्यकता नाही. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांचा बोजा बिस्तरा बांधावा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab on what will uddhav thackeray do now supreme court shinde government survived asc