राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकराने तीव्र निषेध व्यक्त केला असताना दुसरीकडे भाजपाकडून देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात आता भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उद्धवजी, आता करून दाखवायची वेळ”

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “केंद्रीय तपास यंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावं. देव, देश आणि धर्मासाठी हे बोलायची नाही, उद्धवजी आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्यांच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“शरद पवारांसमोर झुकू नका. नवाब मलिकांची हकालपट्टी करा. या तीन पक्षांमध्ये आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडेच आहे. अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अशी भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

“सरकारची बोटचेपी भूमिका का?”

दरम्यान, राज्य सरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. “आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी या प्रकरणांचा कसा संबंध आहे यासंदर्भातल्या चौकशीला राज्य सरकार थांबवू का पाहात आहे? हे मर्दांचं सरकार आहे म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेत आहेत हा आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

“उखाड दिया म्हणणं सोपं आहे”

“आत्ताची इडीची या तिन्ही प्रकरणांतली संयुक्त चौकशी आहे. उखाड दिया लिहिणाऱ्यांना एवढी तरी बुद्धी असेल की दाऊदला उखाड दिया करण्याचा प्रयत्न २०१७पासून केंद्रातलं भाजपा सरकार करतंय. फक्त उखाड दिया म्हणणं सोपं आहे. ते फक्त शब्दशूर आहेत. भाजपाचं सरकार निर्णयशूर आहे. यात फरक आहे. बोरूबहाद्दरांना आम्ही याचं ट्रेनिंग द्यायला तयार आहोत”, असं देखील शेलार म्हणाले.

संजय राऊतांनी थेट पंतप्रधान कार्यालयात सादर केले पुरावे; म्हणाले, “केंद्राकडून कारवाईची अपेक्षा…”!

“राज्यात आडनावावरून न्यायिक भूमिका ठरतात का?”

“संजय राठोडांवर आरोप झाला, त्यांचा लागलीच राजीनामा. पण नवाब मलिकांवर अतीभयंकर आरोप झाला, त्यांचा राजीनामा न घेता समर्थन होत आहे. संजय राठोड आणि नवाब मलिक यांच्यातली न्यायिक भूमिका कोणती? संभाजीराजेंकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. पण नवाब मलिकांच्या रुदालीत सामील व्हायला सगळं मंत्रिमंडळ लगेच दाखल होतं. या सरकारची प्राथमिकता कशाला आहे? या राज्यात आडनावावर न्यायिक भूमिका ठरतात का?” असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar targets cm uddhav thackeray on nawab malik case issue pmw